पूरग्रस्त ‘ब्रम्हनाळ’ गाव घेतलं प्रकाश आंबेडकर यांनी दत्तक!

सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यामध्ये असणाऱ्या ब्रम्हनाळ गावात महापुराचं पाणी शिरलं. स्थानिक गावकऱ्यांकडून बचावकार्य सुरु असतानाच एक दुर्दैवी अपघात घडला. एक बोट पाण्यात उलटून 14 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. याच पूरग्रस्त गावाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आता दत्तक घेतलं आहे.
पूरग्रस्त ब्रम्हनाळ गावातील 700 कुटुंबांसमावेत 3500 लोकसंख्येच्या पुनर्वसनाची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. दत्तक घेतल्यानंतर पुढील गोष्टींची जबाबदारी आंबेडकरांमार्फत घेण्यात येणार आहे
गावामध्ये स्वच्छता आणि औषध फवारणी, आरोग्य तपासणी व औषध उपचार केले जातील
700 कुटुंबाना पुढील एक महिना पुरेल एवढी रेशन धान्याची व्यवस्था केली जाईल
गावातील विदयार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्य दिले जाईल
गावात स्वच्छ पाण्याची कायमस्वरुपी सोय व्हावी म्हणून वॉटर ATM लावण्यात येईल
गावकऱ्याचे मनोधैर्य उंचावण्यासाठी मानसोपचार आणि वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातील
गावकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल
अशा संकटकाळात ब्रम्हनाळ गाव प्रकाश आंबेडकर यांनी दत्तक घेतल्यामुळे गावचे सरपंच आणि गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. ग्रामपंचायतीनेदेखील पत्राद्वारे पुनर्वसनासाठी आमचे गाव देत असल्याचं जाहीर केलं.