पावसाच्या तडाख्याने मालिकांचे शुटिंग रखडले !
दोन दिवल सलग पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे टिव्ही इंडस्ट्रीलाही या पावसाचा तडाखा बसला आहे.

मुंबईमध्ये पावसाने सलग दोन दिवस हजेरी लावल्यामुळे सर्व मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. जोरदार पडलेल्या पावसामुळे मुंबई-ठाण्यावर आता संकट कोसळले असून राज्यभरातही मुसळधार पावसाने नागरिकांचे हाल सुरुच आहेत. तसेच दोन दिवस सलग पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे टिव्ही इंडस्ट्रीलाही या पावसाचा फटका बसला आहे.
या मालिकांच्या शुटींगचे ‘पॅक अप’
मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील बऱ्याच मालिकांचे गोरेगवमधील फिल्मसिटीत चित्रीकरण केले जाते. सलग दोन दिवस पडलेल्या पावसामुळे अनेक मालिकांच्या सेटवरही पाणी साचले.
तसेच पावसामुळे वाहतुक व्यवस्थेची कोंडी झाल्याने अनेक कलाकारांना फिल्मसिटीच्या सेटवर पोहचणे शक्य होत नाहीए.
त्यामुळे मालिकांच्या कलाकारांनाही सुट्टी देण्यात आली आहे. ‘तू अशी जवळी रहा’, ‘वर्तुळ’, ‘एक घर मंतरलेलं’, ‘फुलपाखरू’ या मालिकांचे चित्रीकरण पावसामुळे थांबविण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या नवीन मालिकेच्या चित्रीकरणावरही पावसाचा परिणाम झालाय.तसेच ‘बिग बॉस मराठी 2’ चे घरही याच फिल्मसिटीमध्ये उभारले गेले आहे.
त्यामुळे बिग बॉसच्या स्पर्धकांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे सर्वांचीच दैना झाली असली तरी काही काही मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे.
तर काही मालिकांचे शुटींग रद्द करण्यात आले आहे. परंतु हा पाऊस असाच सुरु राहिला तर मालिकांना आर्थिक नुकसानाच्या समस्येला मात्र सामोरे जावे लागेल.