हृदयद्रावक! शेतकरी आत्महत्येवर मुलाची कविता; काही तासांत शेतकरी वडिलांचीच आत्महत्या

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील तिसरीत शिकणाऱ्या प्रशांत बटुळे या विद्यार्थ्याने ‘शेतकरी मायबापा, करु नको रे आत्महत्या ’ ही कविता सादर केली. मात्र त्यानंतर अवघ्या तीन तासांत त्याच्या शेतकरी वडिलांनीच आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव मल्हारी बटुळे आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे मल्हारी बटुळे यांना आपले जीवन संपवण्याची वेळ आली.
या हृदयद्रावक घटनेबद्द्ल कृषिमंत्री दादा भुसे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. कितीही कठीण प्रसंग असला, तरी शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन भुसे यांनी केलं. कठीण समयी सरकार शेतकऱ्यांसोबत आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार उपाय योजना करत आहे. पाथर्डीच्या घटनेचा कृषिविभागाकडून लवकरच अहवाल मागवून चौकशी करण्याचे आश्वासन भुसे यांनी दिलं.
तर माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनावर टीका करताना सरकार गंभीर नसल्याचं म्हटलंय. एक लहान मुलगा शेतकऱ्यांच्या दुःखाबद्दल, वेदनेबद्दल सांगतो आहे आणि त्याच्याच घरात अशी घटना होत असेल तर ही चिंतेची बाब आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जो पर्यंत निर्णय घेणार नाही तो पर्यंत समस्या सुटणार नाही असं माजी त्यांनी म्हटलं.