धक्कादायक! बुलडाणा जिल्ह्यातून वर्षभरात 556 मुली बेपत्ता

बुलडाणा जिल्ह्यात एक वर्षात 556 मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलीय. यामध्ये 18 ते 25 वयोगटातील युवतींचं प्रमाण अधिक असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
बुलडाणा जिल्ह्यात 2019 मध्ये जानेवारी ते डिसेंबर या एक वर्षात मुलींचे अपहरण आणि बेपत्ता असल्याच्या 556 तक्रारींची नोंद झाली आहे. यामध्ये शून्य ते 18 वर्षाच्या आतील 84 तक्रारी तर 18 ते 25 वयोगटातील 472 तक्रारी वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आल्याय. यापैकी 431 प्रकरणांचा छडा लागला असून अजूनही 125 मुली बेपत्ता आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
दिवसेंदिवस वयात आलेल्या मुली घरून पळून जाणे किंवा मुलींना फूस लावून पळून नेने अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे शासकीय आकडेवारी नुसार समोर आलं आहे.
त्यामुळे पालकच नव्हे तर सर्वांसाठीच हा चिंतेचा विषय ठरत आहे.
याला विभक्त कुटुंबपद्धती जबाबदार?
आधी आपल्या देशात संयुक्त कुटुंब पद्धती होती.
यामध्ये वयात आलेल्या मुला-मुलींना प्रेम – जिव्हाळा मिळत होता.
सोबतच सोशल मिडियाचं प्रमाण नसल्यागतच होतं.
आता विभक्त कुटुंबपद्धती आली आणि सोशल मीडियाचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढलाय.
त्यामुळे सोशल मीडियावर प्रेमाच्या उदात्तीकरणाच्या अतिरेकामुळे तरुणी कुटुंबियांच्या भावनांचा विचार न करता घरून पलायन करण्याचे धाडस करतात, असं मत अभ्यासकांकडून आणि महिला सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल जात आहे..
तर मुलींना फूस लावून पळलून नेल्याच्या अनेक तक्रारी पालकांनी पोलिसांत केल्या आहेत. मात्र याला काही प्रमाणात पालक देखील जबाबदार असल्याचं मत अभ्यासकांनी व्यक्त केलंय. वयात आलेल्या मुलामुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय करणं, त्यांना वेळ देणं सोशल मीडियाचा अतिरेक टाळणं ही खबरदारी पालकांनी घेतल्यास अशा घटनांना आळा बसेल एवढे मात्र निश्चित..