अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रासह देशभरात आता लॉकडाऊन आहे. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर खूप ताण पडतोय. त्यामुळे राज्याची आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकूण ७ मंत्रीमंडळ सदस्यांची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यात प्रभावी उपाय योजना करण्यासाठी या समितीचं गठन केलं गेलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, जलसंपदामंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात , नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब यांचा समावेश आहे. या समितीमार्फत कोरोनाशी लढणाऱ्या यंत्रणेला बळ देण्यात येणार आहे.
राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा प्रयत्न आहे. लॉकडाऊनमुळे ठप्प झालेले उद्योग व्यवसाय, व्यापार यांना पुन्हा बळकट करण्यासाठी ११ तज्ज्ञ सद्यांची समिती स्थापन केली गेली आहे. या समितीकडून सुचवल्या जाणाऱ्या उपाययोजनांवर मंत्रीमंडळ समिती निर्णय घेईल.