Monday, November 17, 2025 12:59:48 AM

Actress Nupur Alankar: PMC बँक घोटाळ्यात सगळं गमावल्यावर अभिनेत्रीने घेतला संन्यास, 'आश्रमात येणारे लोक वस्त्रं देतात अन्...'

अभिनेत्री नुपूर अलंकार तिच्या ‘अगले जनम मोहे बिटिया ही किजो’ आणि ‘घर की लक्ष्मी बेटियां’ या मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखली जाते. नुपूरने 2022 मध्ये संसाराचा त्याग करून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला.

actress nupur alankar pmc बँक घोटाळ्यात सगळं गमावल्यावर अभिनेत्रीने घेतला संन्यास आश्रमात येणारे लोक वस्त्रं देतात अन्

मुंबई: अभिनेत्री नुपूर अलंकार तिच्या ‘अगले जनम मोहे बिटिया ही किजो’ आणि ‘घर की लक्ष्मी बेटियां’ या मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखली जाते. नुपूरने 2022 मध्ये संसाराचा त्याग करून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. आता ‘टेली टॉक इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत नुपूरने या निर्णयामागचं कारण सांगितलं. तसेच अभिनय क्षेत्रात असतानाही शिस्तबद्ध आणि आध्यात्मिक जीवन जगत होती, पण पीएमसी बँक घोटाळा, आई आणि बहिणीचा मृत्यू या घटनांनी तिला संन्यास घेण्यास प्रवृत्त केलं.

नुपूर म्हणाली, "माझ्या आयुष्यात जे काही घडले, ते सगळं गुगलवर सापडेल. हे सगळं PMC बँक घोटाळ्यापासून सुरू झालं. त्या घटनेनंतर आयुष्याचं कठोर वास्तव समोर आलं. या घोटाळ्यानंतर माझी आई आजारी पडली, तिच्या उपचारासाठी आर्थिक समस्या आल्या. याचदरम्यान माझ्या आईचा आणि बहिणीचा मृत्यू झाला. हेच निमित्त ठरलं. असाही मला सांसारिक जीवनात रस उरला नव्हता. त्यामुळे मी त्यांची (पतीची) परवानगी घेतली. त्यांनी अनिच्छेने होकार दिला आणि मी आध्यात्मिक मार्गावर निघाले."

नुपूर सध्या निवडलेल्या मार्गावर समाधानी आहे. ती इतरांनाही साधं, देवाशी जोडलेलं आयुष्य जगण्याचा सल्ला देते. अध्यात्मामुळे नुपूरच्या आयुष्यात शांतता आली. नुपूर म्हणाली, "मी या भौतिक जगापासून दूर गेल्यानंतर आयुष्य सोपं झालं. आधी वीजबिलं, लाइफस्टाइलचे खर्च, डायट्स सगळं जपावं लागायचं. आता माझा महिन्याचा खर्च 10-12 हजार आहे. वर्षातून काही वेळा मी ‘भिक्षाटन’ करते, म्हणजे अन्नासाठी भीक मागते. त्या अन्नाचा काही भाग मी देव आणि माझ्या गुरूंना अर्पण करते. त्यामुळे अहंकार नाहीसा होतो", असं नुपूरने म्हटलं केलं.

हेही वाचा: Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझला खलिस्तानी संघटनेकडून धमक्या; KBC चा एपिसोड ठरला वादाचं कारण

पुढे बोलताना, "माझ्याकडे फक्त चार-पाच जोड कपडे आहेत. आश्रमात येणारे लोक काही वस्त्रं देतात, ती माझ्यासाठी पुरेशी आहेत. मी गुहांमध्ये राहिले आहे, मला उंदीर चावले आहे, कडाक्याच्या थंडीत गोठल्याचा अनुभव घेतला, पण तरीही मी समाधानी आहे," असं नुपूर सांगते.

पीएमसी घोटाळ्यानंतर विकले दागिने
नूपुर अलंकारने 2019 मध्ये PMC बँक घोटाळ्यामुळे दागिने विकले होते. "घरात एक पैसाही नव्हता, आमची सर्व खाती गोठवली गेली होती. त्यामुळे दागिने विकण्याशिवाय पर्याय नव्हता. एका सहकलाकाराकडून मला 3000 रुपये उसने घ्यावे लागले. तर दुसऱ्याने प्रवासासाठी 500 रुपये दिले. आतापर्यंत मी मित्रांकडून 50 हजार रुपये उसने घेतले आहेत. आम्हाला बँकेतील सर्व पैसे गमावण्याची भीती वाटते", असं ती म्हणाली होती.

पुढे नुपुर अलंकार म्हणाली, "मी कधीच कल्पनाही केली नव्हती की माझी आणि माझ्या कुटुंबाची संपूर्ण आयुष्यभराची कमाई अशा प्रकारे गोठवली जाईल. आता मी काय करू? घर गहाण ठेवू का? माझ्याच कष्टाने कमावलेले पैसे गोठवण्यात का आले? मी नियमितपणे कर भरत आलेय, तरी आज मीच का त्रास सहन करते आहे?” असं नुपूर पीएमसी बँक घोटाळ्यानंतर म्हणाली होती.
 


सम्बन्धित सामग्री