Monday, March 09, 2026 08:33:59 AM

Marathi Serial TRP चा 'महामुकाबला'; 'ठरलं तर मग'चा पुन्हा डंका, तर झी मराठीच्या 'कमळी'ने दिली तगडी फाईट, पाहा कोण ठरलं वरचढ

स्टार प्रवाहने आघाडी कायम ठेवली असून झी मराठीच्या ‘कमळी’ आणि ‘तारिणी’ने टॉप 5 मध्ये मुसंडी मारत स्पर्धा रंगवली आहे.

marathi serial trp चा महामुकाबला ठरलं तर मगचा पुन्हा डंका तर झी मराठीच्या कमळीने दिली तगडी फाईट पाहा कोण ठरलं वरचढ

मुंबई: मनोरंजनाच्या दुनियेत दर आठवड्याला एक वेगळंच 'युद्ध' रंगलं असतं आणि या युद्धाचा निकाल म्हणजे प्रेक्षकांनी दिलेला 'TRP'. छोट्या पडद्यावर सध्या नवनवीन मालिकांची मांदियाळी सुरू असली, तरी जुन्या आणि लोकप्रिय मालिकांनी आपलं स्थान अढळ ठेवलं आहे. 14 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2026 या सप्ताहाचा 'BARC' इंडियाचा रिपोर्ट समोर आला असून, या शर्यतीत पुन्हा एकदा 'स्टार प्रवाह'ने बाजी मारली आहे. मात्र, झी मराठीच्या काही मालिकांनीही मुसंडी मारत स्पर्धेत चुरस निर्माण केली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी 'ठरलं तर मग' ही मालिका या आठवड्यातही 4.3 रेटिंगसह सिंहासनावर विराजमान आहे. सायली आणि अर्जुनच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवलं आहे. या मालिकेच्या लोकप्रियतेचा आलेख पाहता, तिला टप्पे देणं सध्या तरी कोणत्याही मालिकेला शक्य झालेलं नाही. याच वाहिनीवरील 'तू ही रे माझा मितवा' या मालिकेने 4.1 रेटिंगसह दुसरा क्रमांक पटकावत पकड मजबूत केली आहे.

दुसरीकडे, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवरील मालिकांनाही प्रेक्षक पसंती देत असल्याचं चित्र आहे. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांची मुख्य भूमिका असलेली 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' ही मालिका 3.5 रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. सावित्रीबाईंच्या संघर्षाची गाथा प्रेक्षकांच्या काळजाला भिडतेय, हे या आकड्यांवरून स्पष्ट होतं. त्यापाठोपाठ 'लग्नानंतर होईलच प्रेम' (3.3) आणि 'तुझ्या सोबतीने' (3.3) या मालिकांनीही मोहोर उमटवली आहे.

हेही वाचा: Western Line Local : मुंबईकरांनो आता चिंता नको! रेल्वे प्रवास होणार अधिकच सुखकर, कोर्टाने दिले महत्त्वाचे आदेश

झी मराठीच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास, 'कमळी' या मालिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 3.8 रेटिंगसह या मालिकेने थेट टॉप 3 मध्ये झेप घेतली असून, दिग्गज अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या मालिकेलाही मागे टाकलं आहे. तेजश्री प्रधानची 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका 3.5 रेटिंगसह सहाव्या स्थानावर आहे. याव्यतिरिक्त 'तारिणी'ने 3.6 रेटिंग मिळवत प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे, तर 'लक्ष्मी निवास' (3.3) आणि 'देवमाणूस' (3.1) या मालिकांनीही प्रतिष्ठा टिकवून ठेवली आहे.

या आठवड्यातील टीआरपी गणितात काही मालिकांची कामगिरी संमिश्र राहिली. 'वचन दिले तू मला' (3.0), 'तुला जपणार आहे' (2.5), 'घरोघरी मातीच्या चुली' (2.3) आणि 'शुभ श्रावणी' (2.3) या मालिकांना प्रेक्षकांचा अधिक पाठिंबा मिळवण्यासाठी आगामी काळात कथानकात मोठे वळण आणवे लागणार आहे. तर 'येड लागलं प्रेमाचं' (1.09) आणि 'सावळ्याची जणू सावली' (1.08) या मालिका सध्या शर्यतीत मागे पडताना दिसत आहेत.

या आठवड्यातील रेटिंगनुसार टॉप 5 मालिकांमध्ये ‘ठरलं तर मग’ ही मालिका 4.3 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ‘तू ही रे माझा मितवा’ 4.1 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर असून, ‘कमळी’ 3.8 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर ‘तारिणी’ 3.6 रेटिंगसह स्थान मिळवते, तर ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ आणि ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिका 3.5 रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहेत.

थोडक्यात सांगायचे तर, प्रेक्षकांच्या पसंतीचा कौल हा नेहमीच दर्जेदार कथानक आणि अभिनयाला असतो. 'स्टार प्रवाह'ला मागे टाकण्यासाठी इतर वाहिन्या नवनवीन प्रयोग करत आहेत. आता पुढच्या आठवड्यात कोणता नवा ट्विस्ट प्रेक्षकांना टीव्हीसमोर खिळवून ठेवणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

हेही वाचा: Arvind Kejriwal: दिल्ली मद्यघोटाळा प्रकरण; पुराव्याअभावी अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता


सम्बन्धित सामग्री