मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मयुरी वाघ ही 'अस्मिता' या मालिकेमुळे घराघरात पोहोचली. या मालिकेच्या सेटवर मयुरी आणि पियुष रानडेची मैत्री झाली. त्यांच्यातील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, लग्नाच्या दोन वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला. अशातच आता अनेक वर्षांनी अभिनेत्रीने पहिल्यांदाच घटस्फोटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
मयुरी वाघने नुकतच सौमित्र पोटे यांच्या 'मित्र म्हणे' या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीवेळी लग्नाबद्दल बोलताना मयुरी म्हणाली की, "मला आता कोणत्याच गोष्टीचा पश्चाताप नाही. पण, मी लग्नाचा निर्णय खूप लवकर घेतला असं मला वाटतं. कारण, मी आताची पिढी पाहतेय. आताच्या मुली फार सॉर्टेड आहेत. एक ठराविक अमाऊंट पगार असलेला मुलगा पाहिजे. त्याचं घर असायला पाहिजे, कुटुंबात या गोष्टी पाहिजेत हे अलीकडच्या काळात लग्न करताना पाहिलं जातं. पण, माझ्या बाबतीत असं झालं नाही."
हेही वाचा: Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी काम केलेला मराठी चित्रपट कोणता?, जाणून घ्या बिग बींचा मराठी चित्रपटसृष्टीशी संबंध
पुढे बोलताना, तो एक प्रवाह होता आणि त्यातच मी लग्नाचा निर्णय घेतला. माझ्या आई-वडिलांनी सुद्धा या निर्णयात माझी साथ दिली. त्यांना त्यावेळी कदाचित हे सगळं पटलं नसेल. पण, तरीही त्यांनी पाठिंबा दिला. सहा महिन्यांतच जाणवलं होतं आपला लग्नाचा निर्णय चुकला पण, मला ते कळायला आणि स्वीकारायला खूप वेळ लागला, असं मयुरीनं सांगितलं.
त्यावेळी ‘ती फुलराणी’ शूट करत होती. ती म्हणाली, "सहकलाकारांनाही जाणवलं होतं, माझ्या आयुष्यात काहीतरी सुरू आहे. जे मी कोणाबरोबरही शेअर करू शकत नव्हते. पण, ते माझ्यासोबत असायचे. मी डिस्टर्ब आहे किंवा सीन संपला की हिच्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे हे त्यांना दिसत होतं. अनेकदा पहाटे दोन-तीन ते चारवाजेपर्यंत ते सगळे माझ्यासाठी थांबायचे. कारण, तेव्हा मला झोप लागायची नाही."
मयुरी म्हणाली, "माझ्या आई-बाबांना चार महिन्यांत समजलं होतं की, हे सगळं चुकलंय पण, ही गोष्ट मला समजायला जवळजवळ दीड वर्षे गेली. ज्या व्यक्तीवर मी विश्वास ठेवला ती व्यक्ती हे करू शकत नाही, हे समजायला मला खूप वेळ लागला. पण, आता जाणवतं की, ह्या सगळ्याचा विचार मी आधी का नाही केला? ह्या सगळ्यातून बाहेर यायला मला सहा महिने लागले. तेव्हा मी शूटिंग करत होते म्हणून मी सावरले. मालिकेत रोमँटिक ट्रॅक सुरू होता, मात्र वैयक्तिक आयुष्यात सेपरेशनचा काळ सुरू होता. काही गोष्टी मी विचारल्यासुद्धा. पण त्यावर मला स्पष्टीकरण मिळालं. मी विश्वास ठेवला. पण जेव्हा मला रिअॅलिटी चेक मिळाला तेव्हा मी ठरवलं आता कुणावर विश्वास ठेवायचा नाही."
या मुलाखतीदरम्यान मयुरीला पियुषसोबतच्या लग्नामध्ये शारीरिक छळ झालेला का? या प्रश्नावर उत्तर देताना मयुरी 'हो' असं म्हणाली. अभिनेत्रीनं सांगितलं की, करोनादरम्यान मी एकटी असायचे त्यामुळे माझ्या आईला खूप काळजी वाटायची.