Ajit Pawar Death : आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात होऊन त्यांच्यासह विमानातील सर्वजण मृत्युमुखी पडले. या सर्व घटनेची पार्श्वभूमी काय होती, हा अपघात कसा झाला असावा, याविषयी संबंधित तज्ज्ञांकडून वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. पूर्वी आकाशात नेमके काय घडले आणि तंत्रज्ञांनी याबद्दल काय निरीक्षणे, मते नोंदवली आहेत, त्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊ..
विमान वाहतूकतज्ज्ञ नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचे विमान सकाळी 9:00 वाजताच्या सुमारास बारामतीमध्ये लँडिंग करत होते. त्या वेळी परिसरात धुक्यामुळे व्हिजिबिलिटी (दृश्यमानता) काही प्रमाणात कमी होती. वैमानिकाने पहिल्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी न झाल्याने त्याने 'गो राऊंड' घेण्याचा निर्णय घेतला. 'गो राऊंड' म्हणजे धावपट्टीला स्पर्श करण्यापूर्वी पुन्हा आकाशात उड्डाण करून लँडिंगसाठी फेरचक्र मारणे. दुर्दैवाने, दुसऱ्या प्रयत्नात धावपट्टी क्रमांक 19 वर येण्यापूर्वीच विमानाचा अपघात झाला.
वैमानिकाचा अखेरचा 'मेडे' कॉल
विमान कोसळण्यापूर्वी वैमानिकाने नियंत्रण कक्षाला 'मेडे' (Mayday) हा आणीबाणीचा संदेश पाठवला होता. विमान वाहतूक क्षेत्रात 'मेडे' या शब्दाचा अर्थ 'मदत करा' (Help me) असा होतो. जेव्हा विमानातील प्रवासी किंवा क्रूच्या जीवाला धोका निर्माण होतो किंवा इंजिन निकामी होण्यासारखे मोठे तांत्रिक बिघाड होतात, तेव्हाच हा संदेश तीन वेळा दिला जातो. वैमानिकाने तातडीच्या मदतीसाठी हा कॉल केला खरा, परंतु मदतीपूर्वीच विमानाचा भीषण अपघात होऊन ते आगीच्या भक्षस्थानी पडले.
खड्ड्यात आदळल्याने विमानाचा चक्काचूर
अपघाताच्या तांत्रिक कारणांचा आढावा घेताना नितीन जाधव यांनी सांगितले की, धावपट्टीवर पोहोचण्यापूर्वीच विमान एका 15 ते 20 फूट खोल खड्ड्यात आदळले. या जोरदार धडकेमुळे विमानाचे नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि ही दुःखद घटना घडली. या भीषण अपघातात विमानातील अजित पवार यांच्यासह इतर कोणाचाही जीव वाचू शकला नाही. अपघातानंतर विमानाने पेट घेतल्याने सर्व जण आतमध्येच होरपळले गेले.
हेही वाचा - Riteish Deshmukh Tweet: ‘त्यांचं अकाली जाणं ही अतिशय मोठी हानी…’; अजित पवारांच्या निधनाच्या बातमीने रितेशला मोठा धक्का
संबंधित कंपनीचा अपघातांचा इतिहास
ज्या व्हीएसआर (VSR) एव्हिएशन कंपनीच्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते, त्या कंपनीचा इतिहासही यापूर्वी वादात राहिला आहे. यापूर्वी 14 सप्टेंबर 2023 रोजी याच कंपनीच्या विमानाचा मुंबई विमानतळावर अपघात झाला होता. त्या वेळीही विमानात 6 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्स होते, मात्र सुदैवाने तेव्हा कोणालाही आपला जीव गमवावा लागला नव्हता. मात्र, आजच्या भीषण दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार वाचू शकले नाहीत.
महाराष्ट्राचा 'धडाडीचा' नेता हरपला
अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ सांभाळण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. त्यांच्या कामाचा धडाका आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे त्यांची एक वेगळी ओळख होती. त्यांच्या अशा अचानक आणि भीषण अपघातातील निधनामुळे सध्या बारामतीसह संपूर्ण राज्य हळहळत असून, रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.
हेही वाचा - Devendra Fadnavis: 'दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला' देवेंद्र फडणवीस भावनिक प्रतिक्रिया