नवी दिल्ली: येत्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या आव्हानात्मक दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टी-20 आणि वनडे संघांची अधिकृत घोषणा केली आहे. गेल्या वर्षी वनडे विश्वचषकावर नाव कोरणारी ही ‘विजेती’ टीम इंडिया आता कांगारूंच्या मायदेशात ऐतिहासिक व्हाईट-बॉल मालिका जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. या दौऱ्यात 3 टी-20, तीन वनडे आणि एकच कसोटी सामना खेळवला जाणार असून, दोन्ही मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी कर्णधारपदाची धुरा हरमनप्रीत कौर हिच्याकडे सोपवण्यात आली आहे.
भारती फुलमालीचे 7 वर्षांनंतर ‘विराट’ पुनरागमन
या दौऱ्यातील सर्वात मोठी आणि चर्चेची बाब म्हणजे विदर्भाची लेक भारती फुलमाली हिचे संघात झालेले पुनरागमन. तब्बल 7 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीला पुन्हा टी-20 संघात स्थान मिळाले आहे. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर तिने निवड समितीला आपल्या क्षमतेची दखल घ्यायला भाग पाडले आहे. तिच्यासोबतच प्रतिभावान फिरकीपटू श्रेयंका पाटील हिने दुखापतीवर मात करत संघात दमदार पुनरागमन केले असून, यामुळे भारतीय गोलंदाजी अधिक धारदार होणार आहे.
युवा खेळाडूंना संधी, दिग्गजांना डच्चू?
वनडे संघात भविष्याचा विचार करून काही धाडसी निर्णय घेण्यात आले आहेत. वैष्णवी शर्मा, जी कमलिनी आणि काश्वी गौतम यांसारख्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून, संघात नव्या जोमाची भर पडली आहे. मात्र, दुसरीकडे उमा चेत्री, यस्तिका भाटिया आणि प्रतीका रावल यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. अष्टपैलू हरलीन देओल वनडे संघात कायम ठेवण्यात आली असली तरी, टी-20 संघातून तिला वगळण्यात आले असून तिच्या जागी श्रेयंका पाटीलची निवड झाली आहे.
हेही वाचा: A R Rahman : 'विकी कौशलचा 'छावा' समाजात फूट पाडणारा चित्रपट; ए. आर. रहमान यांचं वादग्रस्त वक्तव्य
असे असेल ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक
भारतीय महिला संघाच्या ऑस्ट्रेलिया मोहिमेची सुरुवात टी-20 मालिकेपासून होईल.
पहिला टी-20 सामना: 15 फेब्रुवारी, सिडनी
वनडे मालिकेची सुरुवात: 24 फेब्रुवारी, ब्रिस्बेन
एकमेव कसोटी सामना: 6 मार्च, पर्थ
पर्थ येथे होणारा हा कसोटी सामना भारतीय महिला क्रिकेटसाठी ऐतिहासिक आणि खरोखरच कसोटी पाहणारा ठरेल.
भारतीय महिला क्रिकेट संघ (वनडे)
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, रेणुका सिंह ठाकूर, श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), जी कमलिनी (विकेटकीपर), काश्वी गौतम, अमनजोत कौर, जेमिमा रॉड्रिग्स, हरलीन देओल.
भारतीय महिला क्रिकेट संघ (टी-20)
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, रेणुका सिंह ठाकूर, श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), जी कमलिनी (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, अमनजोत कौर, जेमिमा रॉड्रिग्स, भारती फुलमाली, श्रेयंका पाटील.
स्मृती मंधानाच्या उपकर्णधारपदाखाली आणि अनुभवी युवा खेळाडूंच्या संतुलनासह टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ‘विजयी चौका’ मारण्यासाठी सज्ज आहे. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर हा संघ ऑस्ट्रेलियन भूमीवर नवा इतिहास रचेल, अशी अपेक्षा प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यांना आहे.
हेही वाचा: Mumbai Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! तब्बल 120 लोकल फेऱ्या रद्द... घराबाहेर पडण्याआधी तिन्ही रेल्वेमार्गांवरील वेळापत्रक पाहा