श्रीनगर : सोमवारी पहाटे जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले असून, घाबरून अनेक नागरिक घराबाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. रिश्टर स्केलवर 4.8 तीव्रतेचा हा भूकंप सकाळी 5 वाजून 35 मिनिटांनी झाला. प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र (Epicentre) बडगाम जिल्ह्यात होते. ही माहिती German Research Centre for Geosciences (GFZ) कडून देण्यात आली आहे. भूकंपाची खोली सुमारे 10 किलोमीटर नोंदवण्यात आली.
भूकंपाच्या वेळी केंद्राजवळील भागात ढगाळ हवामान होते. तापमान उणे 0.9 अंश सेल्सिअस इतके अत्यंत कमी होते, आर्द्रता सुमारे 95 टक्के होती, तर पश्चिमेकडून सौम्य वारे वाहत होते. बडगामपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरील चारार-ए-शरीफ, तसेच पुलवामा (13 किमी), श्रीनगर आणि शोपियान (सुमारे 21 किमी) या भागांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
किती ऊर्जा मुक्त झाली?
तज्ज्ञांच्या मते, या भूकंपातून सुमारे 1 x 10^12 जूल इतकी भूकंपीय ऊर्जा मुक्त झाली. ही ऊर्जा सुमारे 278 मेगावॅट-तास किंवा जवळपास 239 टन TNT स्फोटाइतकी मानली जाते. तीव्रता मध्यम असली तरी, अशा घटनेमुळे झोपेत असलेले लोक जागे होणे, भीतीचे वातावरण निर्माण होणे आणि थंड, डोंगराळ भागात किरकोळ संरचनात्मक हालचाली होणे शक्य असते. ही माहिती प्रथम ‘Kashmir Weather’ या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आली.
हेही वाचा: BMC Election 2026 Shivsena : BMCत शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक!; दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक शिंदेंच्या गटात
अंदमान-निकोबारमध्येही भूकंप
दरम्यान, सोमवारी पहाटेच अंदमान आणि निकोबारमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. National Centre for Seismology (NCS) नुसार, हा भूकंप सकाळी 3 वाजून 31 मिनिटांनी झाला असून त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.6 इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाचे केंद्र निकोबार भागात होते आणि खोली 10 किलोमीटर इतकी होती.
भूकंप का होतात?
पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली सात प्रमुख टेक्टॉनिक प्लेट्स (Tectonic Plates) आहेत. या प्लेट्स सतत हलत असतात. कधी कधी या प्लेट्स फॉल्ट लाईन्सवर (Fault Lines) एकमेकांवर आदळतात किंवा घर्षण निर्माण होते. त्यामुळे साठलेली ऊर्जा अचानक मुक्त होते आणि जमिनीला हादरे बसतात यालाच भूकंप असे म्हणतात.
सध्या कोणत्याही मोठ्या नुकसानीची माहिती समोर आलेली नसली, तरी प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. भूकंपप्रवण भागांमध्ये सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करण्याचे महत्त्व तज्ज्ञांकडून अधोरेखित करण्यात येत आहे.
हेही वाचा: Maharashtra Weather Update: अवकाळीचं संकट घोंगावतंय; 'या' जिल्ह्यांत पुन्हा पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा