पुणे: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 15 ऑक्टोबर 2025 पासून कात्रज ते किवळे या बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांना तात्पुरते प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे, दररोज हिंजवडीच्या दिशेने होणारी प्रचंड वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत नऱ्हे ते किवळे परिसरात झपाट्याने शहरीकरण आणि आणि औद्योगिक विकास झाला आहे. त्यामुळे, या मार्गावरील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. तसेच, पुणे-मुंबई आणि बंगळुरुकडे जाणाऱ्या कंटेनर्स आणि इतर जड वाहनदेखील याच रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे, या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे, या समस्येचे निराकरण करण्यासाठी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींनी 'हळू चालणारी' वाहने आणि ट्रॅक्टर, जेसीबीसारख्या अवजड वाहनांवर बंदी घालण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, वाहतूक विभागाने हा निर्णय अमलात आणण्याचे ठरवले आहे.
हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar: मोकाट कुत्र्याचा चावा ठरला जीवघेणा, वेदनेने व्याकुळ होत तीन वर्षाच्या चिमुकल्याने प्राण सोडले
अवजड वाहनांसाठी 'या' वेळेत असणार प्रवेशबंदी
सकाळी 8 ते 11 वाजता कात्रजकडून किवळेकडे जाण्यास प्रवेशबंदी असेल. तसेच, सातारा आणि कोल्हापुरातून येणाऱ्या अवजड वाहनांना शिंदेवाडी टोलनाक्यावर थांबवण्यात येईल.सायंकाळी 5 ते 9 वाजता किवळेकडून कात्रजच्या दिशेने जाण्यास मनाई असेल. अवजड वाहनांना उर्सेवाडी टोलनाका किंवा वडगाव फाट्यावर थांबवण्यात येईल.
विशेष म्हणजे, पुणे शहराच्या हद्दीत पेट्रोल, डिझेल, दूध, कृषी उत्पादने आणि अत्यावश्यक सेवा वाहनांना या बंदीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे, पुणेकरांचा प्रवास जलद आणि सुरक्षित होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच. या निर्णयामुळे, अपघातांचे प्रमाणही कमी होईल आणि वाहतूक समस्या सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे.