अंबरनाथ: शिल्पसौंदर्याचा अजोड वारसा लाभलेल्या अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने भक्तीचा मळा फुलणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत भव्य यात्रा पार पडणार आहे. मात्र, या काळात शहरात होणारी गर्दी आणि संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेता, वाहतूक विभागाने कंबर कसली असून अंबरनाथ आणि उल्हासनगरच्या वेशीवरील वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल केले आहेत. भाविकांनी श्रद्धेच्या प्रवासात विनाकारण अडकून पडू नये, यासाठी 14 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी या कालावधीत विशेष नियमावली लागू करण्यात आली आहे.
या काळात मंदिर परिसरातील सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. स्वामी समर्थ चौकाकडून गोविंद तीर्थ पुलाकडे जाणारी आणि उल्हासनगर कॅम्प मधील कैलास कॉलनीकडून येणारी सर्व वाहने स्वामी समर्थ चौकातच अडवण्यात येतील. इथून पुढे जाण्यास मनाई असल्याने, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करणे अनिवार्य आहे. प्रवासाचे नियोजन आधीच केल्यास भाविकांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत.
अवजड वाहनांना 'नो एंट्री' आणि पर्यायी मार्ग
औद्योगिक वसाहतीतील (MIDC) कामगारांची ने-आण करणारी वाहने आणि इतर अवजड वाहनांसाठी वाहतूक पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. वैभव हॉटेलकडून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे. या वाहनांना आता आनंदनगर एमआयडीसी टी-जंक्शन येथून फॉरेस्ट नाका, लादीनाका आणि मटका चौक मार्गे अंबरनाथ पश्चिमेला जावे लागेल. मटका चौकातून पूर्वेकडे जाऊ पाहणाऱ्या जड वाहनांनाही फॉरेस्ट नाक्याचा वळसा घेऊनच वैभव हॉटेल गाठावे लागेल, जेणेकरून मुख्य जत्रा परिसरात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही.
हेही वाचा: Gold-Silver Price : भारत बंदाचा थेट परिणाम; सोन्याच्या किमतीत जबरदस्त वाढ, 10 ग्रॅमचा भाव किती?
वाहनांसाठी असे असेल मार्गक्रमण
स्वामी समर्थ चौकातून पुढे जाणाऱ्या वाहनांना आता डाव्या बाजूला वळण घेऊन रोटरी क्लब, वडवली सेक्शन मार्गे एकतर्फी वाहतुकीने हिंदू स्मशानभूमीकडे जाता येईल. तिथून ही वाहने वैभव हॉटेलच्या दिशेने मार्गस्थ होतील. याशिवाय, ज्यांना उल्हासनगरकडे जायचे आहे, त्यांनी समर्थ चौकातून उजवे वळण घेऊन कानसई मार्गे सुभाष टेकडीचा रस्ता धरावा. पूर्वेकडून येणाऱ्या हलक्या वाहनांना रोटरी क्लब येथे प्रवेशबंदी असल्याने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि हुतात्मा चौकाचा आधार घेत प्रवास पूर्ण करावा.
पार्किंगची सुसज्ज व्यवस्था
यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची शिस्तबद्ध मांडणी व्हावी, यासाठी स्वतंत्र पार्किंग झोन तयार करण्यात आले आहेत. अंबरनाथ पूर्वेतील हिंदू स्मशानभूमी ते गोविंद तीर्थ पुलापर्यंतच्या पट्ट्यात लहान वाहने उभी करण्याची सोय असेल. या ठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहनांच्या येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. मोठी वाहने आणि खासगी बसेससाठी लोकनगरी मैदान राखून ठेवण्यात आले आहे, जेणेकरून रस्त्यांवर अनावश्यक रांगा लागणार नाहीत.
उल्हासनगरकडून येणारी वाहतूक लोकनगरी बसस्थानक, कैलास कॉलनी, ओटी सेक्शन आणि हिललाईन पोलीस ठाणे मार्गे वळवण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या या पावन पर्वावर भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि वाहतूक नियमांचे पालन करून आपला उत्सव सुखकर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा: Udit Narayan: उदित नारायण यांच्या अडचणीत वाढ; पहिल्या पत्नीचा गंभीर आरोप; म्हणाल्या, "संमतीशिवाय काढलं गर्भाशय"