मुंबई: झारखंडचा वेगवान गोलंदाज वरुण ऐरोन याने विजय हजारे करंडक स्पर्धेत झारखंडच्या पराभवानंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 35 वर्षीय आरोनने 2023-24 हंगामाच्या अखेरीस 'First-class' क्रिकेटमधून माघार घेतली होती, तर आता List - A क्रिकेटलादेखील अलविदा केलं. चालू विजय हजारे करंडक स्पर्धेत त्याने चार सामन्यांत 53.33 च्या सरासरीने तीन बळी घेतले.
"गेल्या 20 वर्षांत मी वेगवान गोलंदाजी करण्याच्या आनंदात जगलो आणि खेळलो आहे. आज मी खूप कृतज्ञतेने क्रिकेटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा करत आहे," असा वरुण त्याचा इंस्टाग्राम (Instagram) पोस्टमध्ये म्हणाला.
2010-11 हंगामातील विजय हजारे करंडक स्पर्धेत 150 किमी/तास वेगाने गोलंदाजी करून एरॉन प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर त्याला 2011 मध्ये इंग्लंडविरुद्ध वनडे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली. भारतासाठी त्याने एकूण 18 सामने खेळले आणि 29 बळी मिळवले. भारताकडून त्याचा शेवटचा सामना 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी स्वरूपात झाला.
अनेक पाठीच्या दुखापतींनी त्रस्त असतानाही एरॉनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 66 सामन्यांत 33.27 च्या सरासरीने 173 बळी घेतले. याशिवाय, लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 26 च्या सरासरीने 141 बळी मिळवले. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals), रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (Royal Challengers Bangalore), पंजाब किंग्ज (Punjab Kings), राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals), आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या पाच संघांचे प्रतिनिधित्व वरुणने केले. 2022 च्या हंगामात गुजरात टायटन्ससाठी (Gujarat Titans) खेळताना त्याने आयपीएल (IPL) विजेतेपद जिंकले.