Friday, March 13, 2026 07:14:43 AM

Justice Delayed: नियतीचा क्रूर खेळ! 20 रुपयांच्या लाचेसाठी 30 वर्षे न्यायालयीन लढा दिला; निर्दोष सुटताच दुसऱ्या दिवशी मृत्यू

तब्बल 30 वर्षे फक्त 20 रुपयांच्या लाचेच्या आरोपाशी लढा दिल्यानंतर आणि न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्यानंतर अवघ्या 24 तासांत बाबूभाईंचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

justice delayed नियतीचा क्रूर खेळ 20 रुपयांच्या लाचेसाठी 30 वर्षे न्यायालयीन लढा दिला निर्दोष सुटताच दुसऱ्या दिवशी मृत्यू

Justice Delayed: 'माझ्या आयुष्यावरील कलंक आता पुसला गेला आहे, देवाने आता मला बोलावले तरी दुःख नाही,' हे शब्द होते गुजरातचे पोलीस कॉन्स्टेबल बाबूभाई प्रजापती यांचे. मात्र, नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. तब्बल 30 वर्षे फक्त 20 रुपयांच्या लाचेच्या आरोपाशी लढा दिल्यानंतर आणि न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्यानंतर अवघ्या 24 तासांत बाबूभाईंचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. एका चित्रपटालाही लाजवेल असा हा दुर्दैवी वास्तववादी संघर्ष गुजरातमध्ये समोर आला आहे.

1996 पासून सुरू झालेला संघर्षाचा प्रवास
ही घटना 1996 ची आहे, जेव्हा बाबूभाई प्रजापती अहमदाबादमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून तैनात होते. त्यांच्यावर 20 रुपयांची लाच घेतल्याचा ठपका ठेवून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 1997 मध्ये आरोपपत्र आणि 2004 मध्ये सत्र न्यायालयाने त्यांना 4 वर्षांची शिक्षा व 3,000 रुपये दंड ठोठावला. या अन्यायाविरुद्ध बाबूभाईंनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र त्यांचे अपील पुढील 22 वर्षे प्रलंबित राहिले. या तीन दशकांच्या प्रवासात त्यांना समाज आणि व्यवस्थेच्या अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या.

उच्च न्यायालयाचा निकाल  
दरम्यान, 4 फेब्रुवारी 2026 रोजी गुजरात उच्च न्यायालयाने अखेर या प्रकरणावर निकाल दिला. साक्षीदारांच्या जबाबात असलेले विरोधाभास आणि पुराव्यांचा अभाव पाहून न्यायालयाने बाबूभाईंना सन्मानाने निर्दोष मुक्त केले. त्यांचे वकील नितीन गांधी यांच्या कार्यालयात निकाल ऐकल्यानंतर बाबूभाईंना अश्रू अनावर झाले. "कलंक दूर झाला" ही भावना त्यांच्या चेहऱ्यावर होती. मात्र, 30 वर्षांचा हा मानसिक आणि कायदेशीर ताण त्यांच्या शरीरासाठी जीवघेणा ठरला. घरी परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

हेही वाचा - Pigeon with Gold Chain : आगळीवेगळी चोरी! चोराने नाही, तर चक्क कबुतराने पळवली लाखमोलाची सोनसाखळी; लोक पाहातच राहिले.. मग..

न्याय मिळाला, पण जगण्यासाठी वेळ उरला नाही
वकील नितीन गांधी यांनी अत्यंत भावूक होऊन सांगितले की, "बाबूभाई काल खूप आनंदी होते. मी त्यांना सर्व सरकारी लाभांसाठी अर्ज करण्यास सांगितले होते. मात्र, आज त्यांना फोन केला असता त्यांच्या निधनाची बातमी समजली." ज्या आत्मसन्मानासाठी बाबूभाईंनी 30 वर्षे तुरुंगवास आणि कोर्टकचेऱ्यांच्या फेऱ्या मारल्या, तो आनंद त्यांना फक्त 1 दिवस अनुभवता आला. त्यांना न्याय मिळाला खरा, पण तो न्याय पाहण्यासाठी त्यांचे आयुष्य अपुरे पडले.
 


सम्बन्धित सामग्री