न्यू यॉर्क: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा उच्चांकी गाठताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. 'सैन्य कारवाई हा काही उपाय नाही', असे स्पष्टपणे सांगत त्यांनी शांतता आणि संवादाच्या प्रक्रियेला प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली.
गुटेरेस यांनी दोन्ही देशांतील वाढत्या तणावाबाबत चिंता व्यक्त करत, 'भारत आणि पाकिस्तानमधील संबंध टोकाला पोहोचल्याने मला खंत वाटते. पहलगाममधील भीषण हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या भावना मी समजू शकतो. मी या हिंसाचाराचा तीव्र निषेध करतो आणि पीडितांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो,' असे त्यांनी म्हटले. तसेच, अशा घटनांमध्ये निष्पाप नागरिकांना लक्ष्य करणे कदापि योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संयुक्त राष्ट्रसंघाने या प्रकरणात शांतता राखण्यासाठी आणि कोणताही लष्करी संघर्ष टाळण्यासाठी आपला पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. गुटेरेस यांनी सांगितले की, 'सध्याची स्थिती सहजपणे नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. म्हणूनच दोन्ही देशांनी जास्तीत जास्त संयम बाळगणे आवश्यक आहे. 'चूक करू नका, लष्करी उपाय हा उपाय नाही.' शांततेसाठीच्या प्रयत्नांना आम्ही नेहमीच समर्थन देतो.
दरम्यान, भारत सरकारने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतली असून, दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाईसाठी सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. पाकिस्तानच्या भूमीवरून चालवल्या जाणाऱ्या दहशतवादी हालचालींना रोखण्यासाठी भारताने सिंधू पाणी करारासह अन्य धोरणात्मक उपाय योजनांची घोषणाही केली आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या संयम आणि संवादाच्या आवाहनाने आंतरराष्ट्रीय पातळीवर नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.