Asansol Durga Temple: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे पडसाद आता दिसू लागले आहेत. आसनसोलमधील 'श्री दुर्गामाता चॅरिटेबल ट्रस्ट'च्या व्यवस्थापनाखाली असलेले प्रसिद्ध दुर्गा मंदिर गेल्या अनेक वर्षांपासून बंद होते. मात्र, राज्यात सत्तांतर होताच आणि भाजपचा विजय निश्चित होताच, हे मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, स्थानिक जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, आसनसोल दक्षिण मतदारसंघातून भाजप नेत्या अग्निमित्रा पॉल यांनी 40,839 मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. अग्निमित्रा पॉल या केवळ लोकप्रिय नेत्याच नाहीत, तर मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य दावेदारांच्या शर्यतीतही त्यांचे नाव चर्चेत आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपचा दणदणीत विजय; टीएमसीचा दारुण पराभव
या विधानसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये एकतर्फी विजय मिळवत तृणमूल काँग्रेसची सत्ता उखडून टाकली आहे. भाजपने एकूण 207 जागा जिंकत स्पष्ट बहुमत प्राप्त केले, तर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसीला केवळ 80 जागांवर समाधान मानावे लागले. इतर पक्षांमध्ये काँग्रेसला 2, 'AJUP' ला 2 आणि 'CPIM' ला 1 जागा मिळाली आहे. या निकालांमुळे बंगालच्या राजकारणात नवीन पर्वाची सुरुवात झाली असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले धार्मिक आणि सामाजिक प्रश्न सुटतील, अशी आशा आसनसोलमधील मंदिर उघडण्याच्या घटनेवरून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - Ram Gopal Verma : थलपतीच्या 'विजया'नंतर राम गोपाल वर्मांची 'ती' पोस्ट; करुणानिधींच्या फोटोसह केली बेधडक टिप्पणी
मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम; अमित शाह निरीक्षकाच्या भूमिकेत
बंगालमध्ये ऐतिहासिक विजय मिळाला असला तरी राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या निवडीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सुवेंदू अधिकारी यांचे नाव आघाडीवर आहे, कारण त्यांनी खुद्द ममता बॅनर्जी यांचा पराभव करत भाजपसाठी मोठा विजय खेचून आणला आहे. त्यांच्यासोबतच अग्निमित्रा पॉल यांचेही नाव चर्चेत आहे. भाजप नेहमीच आपल्या निर्णयांनी राजकीय विश्वाला धक्का देण्यासाठी ओळखली जाते. त्यामुळे विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.