नवी दिल्ली: T20 वर्ल्ड कप स्पर्धे दरम्यान भारतीय खेळाडूंसोबत त्यांच्या कुटुंबीयांना राहण्याची परवानगी दिली जाणार नाही, या भूमिकेवर Board of Control for Cricket in India (BCCI) ठाम आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, टीम मॅनेजमेंटने कुटुंबीयांना सोबत राहण्याबाबत स्पष्टता मागितली होती, मात्र बोर्डाने नियमांमध्ये कोणतीही सवलत न देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
BCCI च्या धोरणानुसार 45 दिवसांहून अधिक कालावधीच्या मालिकांमध्ये किंवा स्पर्धांमध्ये कुटुंबीयांना जास्तीत जास्त 14 दिवस राहण्याची परवानगी असते. लहान दौऱ्यांसाठी ही मर्यादा फक्त सात दिवसांची आहे. तथापि, T20 वर्ल्ड कपदरम्यान खेळाडूंसोबत कुटुंबीय राहणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. खेळाडूची इच्छा असेल तर कुटुंबीयांनी स्वतंत्र व्यवस्था करावी, असेही सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा: Tanya Nathan Success Story : तान्या नाथन- केरळच्या पहिल्या महिला अंध न्यायाधीश, रचला इतिहास, जाणून घ्या सविस्तरपणे
कोविड-19 महामारीदरम्यान शिथिल करण्यात आलेले नियम मागील जानेवारीत पुन्हा लागू करण्यात आले. टेस्ट क्रिकेटमधील निराशाजनक कामगिरीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जाते. न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर 0-3 पराभव आणि ऑस्ट्रेलियात 2024-25 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत 1-3 अशी मालिका गमावल्यानंतर बोर्डाने शिस्तबद्धता वाढवण्यावर भर दिला.
अधिकाऱ्यांचे मत आहे की विशेषतः परदेशी दौऱ्यांदरम्यान कुटुंबीयांची उपस्थिती खेळाडूंचे लक्ष विचलित करू शकते आणि कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. याशिवाय सर्व खेळाडूंनी नेहमी संघासोबतच प्रवास करणे बंधनकारक असल्याचा नियमही लागू करण्यात आला आहे.
भारताने T20 वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात USA विरुद्ध विजयाने केली आहे. पुढील सामना अरुण जेटली स्टेडीयम येथे नामिबियाविरुद्ध होणार असून 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सामना रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या एकाग्रतेसाठी बोर्डाने कडक भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
हेही वाचा: Sharad Pawar Health Updates: पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस; सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची अपडेट