पंकज दळवी. प्रतिनिधी. श्रीनगर: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांनी आपला जीव गमावला. या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा दुर्दैवी अंत झाला होता. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे राज्यातील अनेक पर्यटक अडकले होते. या पर्यटकांना सुखरूप मुंबईत घेऊन येणारे पहिले विमान बुधवारी पहाटे साडे तीन वाजता मुंबईत उतरले. तर गुरुवारी दुपारी दोन वाजता उर्वरित पर्यटकांना घेऊन जाणारे दुसरे विमानही मुंबईकडे मार्गस्थ झाले.
श्रीनगरमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे ॲक्शन मोडवर
या विमानातून एकूण 184 पर्यटक असून त्यांना या विशेष विमानाने मुंबईत आणण्यात येणार आहे. यादरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सुखरूप परतलेल्या प्रवाशांसोबत संवाद साधून त्यांना धीर देऊन मुंबईकडे रवाना केले. यावेळी, सुखरूप परतलेल्या पर्यटकांनी आवर्जून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच, 'आमच्या संकटकाळी आमचा लाडका भाऊ मदतीसाठी धावून आल्याबद्दल समाधान वाटत आहे,' अशी भावना सुखरूप परतलेल्या पर्यटकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली.
हेही वाचा: गृहमंत्री अमित शाह राष्ट्रपतींच्या भेटीला; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरही उपस्थित
पर्यटकांसोबत साधला उपमुख्यमंत्री शिंदेंनी संवाद
इतकंच नाही, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडकलेल्या पर्यटकांना त्यांच्या हॉटेल्समधून विमानतळाकडे रवाना केले. यावेळी, अडकलेल्या पर्यटकांचा ताण कमी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासोबत संवाद साधून खास फोटोसेशनही केले. राज्यातील 184 पर्यटकांना घेऊन निघालेले हे विमान गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता मुंबई विमानतळावरील टर्मिनल-1 येथे पोहोचणार आहे.