Tuesday, June 09, 2026 01:59:32 PM

Indore Road Accident : भीषण अपघात! पिकअप पलटी होऊन SUV वर आदळली; 3 लहानग्यांसह 12 जणांचा जागीच करुण अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

अतिवेग आणि ओव्हरलोडिंग हे कारण असल्याची शक्यता असून, अनेक जण गंभीर जखमी आहेत. पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे.

indore road accident  भीषण अपघात पिकअप पलटी होऊन suv वर आदळली 3 लहानग्यांसह 12 जणांचा जागीच करुण अंत मृतांचा आकडा वाढण्याची भीती

मध्य प्रदेशातील धार जिल्हा येथे बुधवारी (29 एप्रिल 2026) रोजी रात्री भीषण अपघात घडून किमान 12 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. इंदूर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वेगात धावणारी पिकअप गाडी उलटून समोरून येणाऱ्या एसयूव्हीला धडकली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

ही दुर्घटना तिरला परिसरातील चिकालिया फाटा येथे रात्री सुमारे साडेआठ वाजता घडली. पिकअपमध्ये सुमारे 35 मजूर प्रवास करत होते. अचानक वाहनाचा ताबा सुटल्याने गाडी तीन ते चार वेळा पलटी झाली आणि रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन एसयूव्हीवर आदळली. अपघातानंतर पिकअपचा चक्काचूर झाला होता आणि जखमी मदतीसाठी आक्रोश करत होते.

मयंक अवस्थी यांनी सांगितले की, वाहन अतिवेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले, त्यानंतर आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले.

डॉक्टरांच्या माहितीनुसार, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून 12 जणांची प्रकृती गंभीर आहे. काही जखमींना पुढील उपचारासाठी इंदूर येथे हलवण्यात आले आहे. धार जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी जखमांची तीव्रता लक्षात घेता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. अनेकजण आपल्या नातेवाईकांचा शोध घेत होते. अपघातातील मृतांमध्ये काही लहान मुलांचाही समावेश असल्याने दुःख अधिकच गडद झाले आहे.

हेही वाचा: Actor Sonali Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ट्रॅफिकमध्ये अडकली, 5 तास एकाच जागी; पोलिसांना आवाहन करताना मात्र इंग्रजी आणि हिंदी भाषेचा वापर

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. गंभीर जखमींना 1 लाख रुपये, तर इतर जखमींना 50 हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच सर्व जखमींवर मोफत उपचार केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अपघातानंतर महामार्ग काही तासांसाठी बंद ठेवावा लागला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अतिवेग, ओव्हरलोडिंग किंवा यांत्रिक बिघाड यापैकी कोणते कारण या दुर्घटनेस जबाबदार आहे, याची चौकशी सुरू आहे. स्थानिकांच्या मते, अशा प्रकारे गर्दीने भरलेल्या पिकअप वाहनांतून मजुरांची वाहतूक करणे या भागात सामान्य बाब आहे. मात्र, या अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न अधोरेखित केला आहे. 

हेही वाचा: Rupee Vs Dollar: डॉलर सुस्साट, रुपया कोमात; पहिल्यांदा गाठला 95.12 चा नीचांकी स्तर, कच्च्या तेलाचा भडका घसरणीमागे कारणीभूत


सम्बन्धित सामग्री