Tuesday, May 20, 2025 04:01:22 PM

दहशतवाद्यांना अद्दल घडवा... सैन्याने टार्गेट निवडावे,पंतप्रधान मोदींनी दिली सैन्याला पूर्ण मुभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा बदला घेण्याचे स्पष्ट निर्देश भारतीय सैन्याला दिले आहेत.

दहशतवाद्यांना अद्दल घडवा सैन्याने टार्गेट निवडावेपंतप्रधान मोदींनी दिली सैन्याला पूर्ण मुभा

नवी दिल्ली: पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा बदला घेण्याचे स्पष्ट निर्देश भारतीय सैन्याला दिले आहेत. त्यांनी सैन्यदलाच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करत, योग्य वेळी योग्य टार्गेट निवडून कारवाई करावी अशी मुभा तीनही सैन्यदलांना दिली आहे. दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात याव्यात, अशी भूमिका मोदींनी घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानी एक उच्चस्तरीय सुरक्षा बैठक पार पडली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, सीडीएस अनिल चौहान आणि तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित होते. याशिवाय एनएसजी, बीएसएफ, सीआरपीएफ आणि इतर सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर लवकरच भारत मोठी कारवाई करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: महाराष्ट्रातील मृत पर्यटकांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत- देवेंद्र फडणवीसांची घोषणा

पहलगामसह काश्मीरच्या इतर भागात देखील सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू केल्या आहेत. विविध भागांमध्ये दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन्स राबवले जात आहेत. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी काश्मीर खोऱ्यात लष्कराची हालचाल वाढली आहे. त्यामुळे लवकरच एखादी निर्णायक कारवाई होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एका तरुण परिषदेत भाषण करताना, 'वेळ कमी आहे आणि लक्ष्य मोठं आहे,' असं वक्तव्य केलं. या वक्तव्यावरून त्यांनी अप्रत्यक्षपणे पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या आगामी धोरणांची झलक दाखवली का, याची चर्चा सुरु झाली आहे. त्यांनी जरी त्यानंतर हे मत सध्याच्या परिस्थितीसाठी नसल्याचं स्पष्ट केलं, तरी देशभरातून हा बदला घेण्यासाठी सरकारकडून निर्णायक पाऊल उचलले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


सम्बन्धित सामग्री