नवी दिल्ली: येत्या 7 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 चा थरार रंगणार आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या महाकुंभासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमी उत्सुक असतानाच, भारताच्या दोन शेजारील शत्रू देशांनी मात्र क्रिकेटच्या मैदानावर राजकारण करण्यास सुरुवात केली आहे. बांगलादेश आणि पाठोपाठ पाकिस्तानने या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची भाषा केल्याने क्रिकेट वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. मात्र, 'विनाकारण खोडा' घालण्याच्या या प्रवृत्तीला आता आयसीसीने चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे.
मुस्तफिजूरचा 'रिलीज' आणि बांगलादेशचा जळफळाट
या वादाची ठिणगी पडली ती आयपीएल 2026 च्या निमित्ताने. कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) बांगलादेशचा स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला संघातून काढून (Release) टाकले होते. या एका व्यावसायिक निर्णयामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा (BCB) असा काही तिळपापड झाला की, त्यांनी थेट वर्ल्ड कपसाठी आपला संघ भारतात न पाठवण्याचा अजब पवित्रा घेतला आहे. वैयक्तिक कारणावरून देशाच्या प्रतिमेला आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेला वेठीस धरण्याचा हा प्रकार म्हणजे "चोराच्या उलट्या बोंबा" असाच म्हणावा लागेल. सुरक्षेचे तकलादू कारण पुढे करत बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिला आहे.
हेही वाचा: Crime News : भयंकर! एकाच खोलीत रक्ताच्या थारोळ्यात 5 मृतदेह; 3 पिस्तूलं आणि 5 गोळ्या, सामूहिक कृत्य की..
पाकिस्तानची 'दुटप्पी' चाल; बंडखोरीला दिले समर्थन
बांगलादेशच्या या पोरकट हट्टाला आता पाकिस्ताननेही फूस लावली आहे. पाकिस्तानी मीडिया 'जिओ न्यूज'च्या दाव्यानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) त्यांच्या संघाच्या वर्ल्ड कप तयारीवर तूर्तास रोख लावली आहे. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यानंतर, आयसीसीने मध्यस्थी करून पाकिस्तानचे सर्व टी-20 वर्ल्ड कप सामने श्रीलंकेत आयोजित केले आहेत. वेळापत्रक निश्चित असतानाही, केवळ भारताची कोंडी करण्यासाठी पाकिस्तान आता बांगलादेशच्या 'सुरक्षेच्या' खोट्या दाव्यांना समर्थन देत आहे. ही 'विनाशकाले विपरीत बुद्धी' असून यामुळे पाकिस्तान स्वतःचेच नुकसान करून घेण्याची शक्यता अधिक आहे.
ICC चा 'डेडलाईन' वार; स्कॉटलँड घेणार बांगलादेशची जागा?
बांगलादेश आणि पाकिस्तानच्या या मनमानी कारभारापुढे न झुकता आयसीसीने आता आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. 'ESPNcricinfo' च्या वृत्तानुसार, आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला 21 जानेवारीपर्यंतचा कडक अल्टिमेटम दिला आहे. जर या तारखेपर्यंत बांगलादेशने भारतात येण्याचे लेखी आश्वासन दिले नाही, तर त्यांना स्पर्धेतून थेट बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. विशेष म्हणजे, बांगलादेशच्या जागी सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या स्कॉटलँड संघाला वर्ल्ड कपमध्ये संधी दिली जाणार आहे. आयसीसीच्या या भूमिकेमुळे 'ब्लॅकमेलिंग' करणाऱ्या बोर्डांचे धाबे दणाणले आहेत.
राजकारणाच्या धुरामुळे क्रिकेटचे नुकसान नको!
भारताने नेहमीच खेळाला प्राधान्य दिले असून, पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत खेळवण्यास संमती देऊन लवचिकता दाखवली आहे. मात्र, खेळाडूंच्या कढण्यावरून किंवा जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी जागतिक स्पर्धेवर बहिष्कार टाकणे हे क्रीडा संस्कृतीला काळिमा फासणारे आहे. बांगलादेश आणि पाकिस्तानने हे समजून घेणे गरजेचे आहे की, क्रिकेट हे त्यांच्या बोर्डाच्या मनमानीवर नाही, तर नियमांवर चालते. 21 जानेवारी ही तारीख आता या दोन्ही देशांसाठी 'करो या मरो'ची ठरणार आहे. क्रिकेटच्या या रणधुमाळीत आता आयसीसी कोणाला झुकवते आणि प्रत्यक्ष मैदानात कोणते संघ उतरतात, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
हेही वाचा: Shivsena UBT: ठाकरे गटाला निवडणुकीनंतर पहिला मोठा धक्का; महत्त्वाच्या वेळी चार नगरसेवक 'नॉट रिचेबल'?