मुंबई: भारतीय हवामान विभागाने देशातल्या 23 राज्यांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. देशभरात एकीकडे उष्णतेची लाट प्रचंड तीव्रतेने जाणवत असतानाच दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टबन्समुळे जम्मू-कश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 25 आणि 26एप्रिल रोजी प्रचंड वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी पूर्व भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आसाम, मेघालय, नागालँड, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पुढील सात दिवस वीजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि पाँडेचेरी या राज्यांमध्येही विजांचा कडकडाट व जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेशात देखील हवामानाने जोर धरला असून, सिक्किममध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील हवामान मात्र याच्या अगदी विरुद्ध आहे येथे तापमान झपाट्याने वाढत असून ब्रम्हपुरीत तब्बल 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा अधिक तीव्र होणार असल्याने हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी पाण्याचे योग्य सेवन, थेट सूर्यप्रकाशापासून बचाव आणि आवश्यक असल्याशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.