Thursday, May 15, 2025 12:02:05 AM

Pahalgam Terror Attack: 4 दिवसांत 537 पाकिस्तानी नागरिक परतले, तर 850 भारतीय मायदेशात दाखल

24 एप्रिल ते 27 एप्रिल या कालावधीत, म्हणजेच या चार दिवसांत, 9 राजनयिक आणि अधिकाऱ्यांसह एकूण 537 पाकिस्तानी नागरिक अटारी-वाघा सीमेवरून भारतातून बाहेर पडले.

pahalgam terror attack 4 दिवसांत 537 पाकिस्तानी नागरिक परतले तर 850 भारतीय मायदेशात दाखल
Edited Image, X

नवी दिल्ली: 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन येथे एक भयानक दहशतवादी हल्ला झाला. हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी, भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना 27 एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले. यासोबतच भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध अनेक मोठी पावले उचलली. पाकिस्तानी नागरिकांसाठी भारत सोडण्याचा रविवार हा शेवटचा दिवस होता. 24 एप्रिल ते 27 एप्रिल या कालावधीत, म्हणजेच या चार दिवसांत, 9 राजनयिक आणि अधिकाऱ्यांसह एकूण 537 पाकिस्तानी नागरिक अटारी-वाघा सीमेवरून भारतातून बाहेर पडले.

850 भारतीय मायदेशात परतले - 

दरम्यान, 850 भारतीय नागरिकांनी पाकिस्तानातून भारतात परतण्यासाठी अटारी सीमेचा वापर केला. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका नेपाळी नागरिकासह 26 जणांचा मृत्यू झाला होता. भारत सरकारने 12 श्रेणीतील अल्पकालीन व्हिसा धारकांना भारत सोडण्याची परवानगी देणारा आदेश जारी केला होता. रविवारी अटारी-वाघा सीमा क्रॉसिंगवरून एकूण 237 पाकिस्तानी नागरिक भारतातून पाकिस्तानात परतले. ज्यात नऊ राजनयिक आणि अधिकारी यांचा समावेश होता. तर, 26 एप्रिल रोजी 81 नागरिक, 25 एप्रिल रोजी 191 नागरिक आणि 24 एप्रिल रोजी 28 नागरिक पाकिस्तानात परतले. 

याशिवाय, रविवारी एका राजनयिकासह 116 भारतीय आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानातून परतले. 26 एप्रिल रोजी 13 राजनयिक आणि अधिकाऱ्यांसह 342 भारतीय परतले. 25 एप्रिल रोजी 287 भारतीयांनी सीमा ओलांडली आणि 24 एप्रिल रोजी 105 भारतीय मायदेशात परतले.

हेही वाचा - भारताची मोठी कारवाई! डॉन आणि जिओसह 16 पाकिस्तानी यूट्यूब न्यूज चॅनेलवर बंदी

अटारी सीमेवर तैनात असलेले प्रोटोकॉल अधिकारी अरुण महल यांनी सांगितले की, 24 ते 27 एप्रिल दरम्यान अटारी-वाघा सीमेवरून एकूण 537 पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानला रवाना झाले, तर 850 भारतीय नागरिक पाकिस्तानातून परतले. तथापि, काही पाकिस्तानी नागरिकांनीही भारत सोडण्यासाठी विमानतळाचा मार्ग स्वीकारल्याचे सांगण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की भारताचा पाकिस्तानशी थेट हवाई संपर्क नसल्याने ते इतर देशांमध्ये गेले असावेत.

हेही वाचा - भारत न सोडणाऱ्यांना 3 वर्षांचा तुरुंगवास?, पहलगाम हल्ल्यानंतर पाक नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश

याशिवाय, ज्या व्हिसा श्रेणी धारकांना 26 एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात व्हिसा ऑन अरायव्हल, बिझनेस, फिल्म, जर्नलिझम, ट्रान्झिट, कॉन्फरन्स, माउंटेनियरिंग, स्टुडंट, टुरिस्ट, ग्रुप टुरिस्ट, तीर्थयात्रा आणि ग्रुप तीर्थयात्रा व्हिसा यांचा समावेश आहे.

 


सम्बन्धित सामग्री