Indian airspace closure For Pakistan
Edited Image
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव कायम आहे. बुधवारी रात्री भारताने पाकिस्तानविरुद्ध आणखी एक मोठी कारवाई केली आहे. भारताने पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. तसेच, NOTAM नोटीस जारी करण्यात आली आहे. भारताने 30 एप्रिल ते 23 मे पर्यंत NOTAM जारी केले आहे. याचा अर्थ असा की 23 मे पर्यंत पाकिस्तानमधून येणारी सर्व विमाने भारतीय हवाई हद्दीत उड्डाण करू शकणार नाहीत.
उच्चस्तरीय बैठकीनंतर घेण्यात आला निर्णय -
पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्यात उच्चस्तरीय बैठक झाली. ही बैठक सुमारे एक तास चालली. या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकिस्तानने भारतासाठी बंद केले हवाई क्षेत्र -
तथापि, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली होती. यानंतर पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा - रॉबर्ट वाड्रा यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरील वादग्रस्त टिप्पणी भोवली; उच्च न्यायालयात होणार सुनावणी
हवाई क्षेत्र बंद झाल्याने विमान प्रवास महागणार -
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) आणि इतर पाकिस्तानी ऑपरेटर्सना भारतीय हवाई हद्द टाळण्यासाठी लांब मार्गांचा वापर करावा लागू शकतो, ज्यामुळे त्यांच्या उड्डाणांचा वेळ आणि खर्च वाढू शकतो. भारताने हवाई क्षेत्र बंद केल्याने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल.
हेही वाचा - पाकिस्तानकडून सलग सातव्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; नियंत्रण रेषेवर केला गोळीबार
पहलगाम दहशतवादी हल्ला -
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामजवळील बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. लष्कर-ए-तैयबा (एलईटी) शी संबंधित द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने सुरुवातीला हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारल्यानंतर गोळ्या झाडल्या होत्या.