नवी दिल्ली: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज, 28 जानेवारीपासून सुरू होत असून हे अधिवेशन 2 एप्रिल 2026 पर्यंत दोन सत्रात चालणार आहे. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनातील अभिभाषणाने सत्राची औपचारिक सुरुवात होणार आहे.
परंपरेनुसार, लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपतींचे अभिभाषण होणार असून, यामध्ये केंद्र सरकारच्या धोरणांचा, प्राधान्यक्रमांचा आणि आगामी काळातील दिशादर्शक कार्यक्रमांचा आढावा मांडला जाणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर त्यावर चर्चा होईल आणि त्यानंतर अर्थसंकल्पीय कामकाजाला वेग येईल.
बजेट सत्र 2026 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, या सत्राची सुरुवात 28 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. संसदेचे हे महत्त्वाचे सत्र दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिला टप्पा 28 जानेवारीपासून 13 फेब्रुवारी पर्यंत चालेल, ज्यामध्ये राष्ट्रपतींचे अभिभाषण, आर्थिक पाहणी आणि केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल. त्यानंतर दुसरा टप्पा 9 मार्च ते 2 एप्रिल 2026 या कालावधीत होणार असून, या काळात अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा, अनुदान मागण्यांवर मतदान आणि महत्त्वाच्या विधेयकांवर निर्णय घेतले जाणार आहेत.
हेही वाचा: Anagar: 7 ते 9 ‘नो मोबाईल-नो टीव्ही’! ‘या’ तरुण महिला नगराध्यक्षांनी का उचललं हे धाडसी पाऊल ?
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 29 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता संसद परिसरातील हंस द्वार येथे माध्यमांना संबोधित करणार आहेत. या मीडिया ब्रीफिंगसाठी फक्त लोकसभा किंवा राज्यसभा प्रेस गॅलरीचे वैध पास असलेल्या पत्रकारांनाच प्रवेश दिला जाणार आहे. कॅमेरामन आणि छायाचित्रकारांसाठी CPIC कडून जारी केलेला पास अनिवार्य असणार आहे.
याच दिवशी, म्हणजे 29 जानेवारीला, आर्थिक सर्वेक्षण 2026-27 संसदेत सादर केले जाणार आहे. आगामी अर्थसंकल्पापूर्वी देशाच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेणारा हा सर्वेक्षण अहवाल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
या अधिवेशनात सरकारकडून अनेक महत्त्वाची विधेयके मांडली जाण्याची शक्यता असून, त्यावर सविस्तर चर्चा होणार आहे. दुसरीकडे, विरोधक आर्थिक, सामाजिक आणि इतर विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजण्याची चिन्हे दिसत असून, संसदेत तीव्र राजकीय घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: Kashmir Weather Situation: निसर्गाची पांढरी चादर ठरली पर्यटकांची डोकेदुखी; काश्मीरमध्ये निसर्गाचा कोप, बर्फवृष्टीने हाहाकार