Saturday, March 07, 2026 05:28:55 AM

Harbhajan Singh Advice: चार सामन्यात 11 विकेट्स घेणारा पाकिस्तानचा 'हा' गोलंदाज भारतासाठी ठरणार व्हिलन? भज्जी पाजीने सांगितला बचावाचा मार्ग

एकीकडे भारताची स्फोटक फलंदाजी आणि दुसरीकडे पाकिस्तानची ही अनपेक्षित गोलंदाजी, असा हा सामना रंगणार आहे. हरभजन सिंगचा हा 'गुरूमंत्र' भारतीय संघ लक्षात ठेवेल अशी आशा आहे.

harbhajan singh advice चार सामन्यात 11 विकेट्स घेणारा पाकिस्तानचा हा गोलंदाज भारतासाठी ठरणार व्हिलन भज्जी पाजीने सांगितला बचावाचा मार्ग

मुंबई: क्रिकेट चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा क्षण आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. उद्या,15 फेब्रुवारीला टी-20 वर्ल्ड कपच्या रणांगणात भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. या 'हायव्होल्टेज' सामन्याकडे संपूर्ण क्रीडा विश्वाचे लक्ष लागले असून, वातावरणात प्रचंड तणाव आणि उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, विजयाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या टीम इंडियासाठी पाकिस्तानचा एक 'हुकमी खेळाडू' डोकेदुखी ठरू शकतो, असा इशारा भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने दिला आहे.

हरभजन सिंगच्या मते, भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असला तरी, पाकिस्तानच्या ताफ्यातील एका गोलंदाजाला हलक्यात घेणे भारताला महागात पडू शकते. तो गोलंदाज म्हणजे उस्मान तारिक. हरभजनने स्पष्ट केले की, "हा सामना भारतच जिंकेल, यात शंका नाही, पण पाकिस्तानकडे उस्मान तारिकसारखा एक दर्जेदार स्पिनर आहे. भारतीय फलंदाजांनी त्याच्या षटकांत अतिशय सावधगिरीने आणि सुरक्षितपणे खेळणे गरजेचे आहे. लहानशी चूकही विजयाच्या वाटेत मोठा अडथळा ठरू शकते, त्यामुळे दबावाखाली न येता हुशारीने फलंदाजी करावी लागेल."

पाकिस्तानच्या संघातील हा खेळाडू आहे तरी कोण?

उस्मान तारिक हा एक ऑफ स्पिनर असून त्याने 1 नोव्हेंबर 2025 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. छोट्याशा कारकिर्दीत त्याने बड्या फलंदाजांना नाकी नऊ आणले आहेत. आतापर्यंत अवघ्या चार सामन्यांत त्याने 11 बळी टिपले असून, 18 धावांत चार विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजांची स्पिनर्ससमोर उडालेली तारांबळ पाहता, तारिकविरुद्धची भारतीय रणनीती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

हेही वाचा: Tadoba Tiger Reserve : ताडोबात उन्हाळ्याची चाहूल! सफारीच्या वेळेत बदल; पर्यटकांना नव्या वेळा नोंदवून घेण्याचे आवाहन

उस्मान तारिकची गोलंदाजी शैली (Action) हेच त्याचे मुख्य हत्यार आहे आणि तेच फलंदाजांसाठी कोडं बनलं आहे. तो चेंडू टाकण्यापूर्वी क्रीझवर क्षणभर थांबतो आणि त्यानंतर हात कोपरात वाकवून चेंडू फेकतो. त्याच्या या विचित्र आणि थांबून चेंडू टाकण्याच्या शैलीमुळे फलंदाजांचा टायमिंग चुकतो. चेंडूचा अंदाज न आल्याने अनेक दिग्गज फलंदाज विकेट गमावून बसले आहेत. त्यामुळे भारतीय फलंदाज त्याच्या या 'जाळ्यात' न अडकता कसा प्रतिहल्ला करतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

तारिकच्या या शैलीवरून सध्या क्रिकेट विश्वात चांगलाच वादंग निर्माण झाला आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याने त्याची ही थांबून चेंडू टाकण्याची पद्धत बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे, तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, भारताचा 'चतुरस्त्र' खेळाडू आर. अश्विनने यावर एक नामी तोडगा सुचवला आहे. अश्विनच्या मते, "जेव्हा तारिक चेंडू टाकण्यापूर्वी थांबतो, तेव्हा फलंदाजांनी बाजूला व्हावे."

एकीकडे भारताची स्फोटक फलंदाजी आणि दुसरीकडे पाकिस्तानची ही अनपेक्षित गोलंदाजी, असा हा सामना रंगणार आहे. हरभजन सिंगचा हा 'गुरूमंत्र' भारतीय संघ लक्षात ठेवेल अशी आशा आहे. आता उद्याच्या महामुकाबल्यात भारतीय वाघ पाकिस्तानच्या या नव्या जाळ्यात न अडकता त्यांना फोडून काढण्यात यशस्वी ठरतात का, याकडे सगळ्या जगाचे डोळे लागले आहेत.

हेही वाचा: IndiGo Flight Bomb Threat: 'विमानात बॉम्ब आहे...'; इंडिगोच्या विमानाच्या शौचालयात सापडली धमकीची चिठ्ठी, प्रवाशांमध्ये घबराट


सम्बन्धित सामग्री