Sunday, March 08, 2026 01:06:05 PM

T20 World Cup: हार मानू नका! दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला तरी भारत अजूनही सेमीफायनल गाठू शकतो; पाहा कसं?

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवानंतर भारतीय संघाचा नेट रन रेट घसरल्याने टी20 विश्वचषकातील उपांत्य फेरीचे समीकरण कठीण झाले आहे.

t20 world cup हार मानू नका दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला तरी भारत अजूनही सेमीफायनल गाठू शकतो पाहा कसं

नवी दिल्ली: आयसीसी टी20 विश्वचषक 2026 मधील सुपर-8 फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या 76 धावांच्या पराभवानंतर भारतीय संघाची उपांत्य फेरीकडे वाटचाल अधिक कठीण बनली आहे. या सामन्यानंतर भारताचा नेट रन रेट मोठ्या प्रमाणात घसरून -3.80 वर पोहोचला असून दक्षिण आफ्रिकेने +3.80 रन रेटसह मजबूत स्थिती निर्माण केली आहे. दरम्यान, वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेविरुद्ध 107 धावांनी दणदणीत विजय मिळवत नेट रन रेट +5.350 पर्यंत नेला आहे. त्यामुळे सुपर-8 गटातील पात्रतेची लढत अधिकच चुरशीची झाली आहे.

गटातील गुणतालिकेची परिस्थिती पाहता भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या तिन्ही संघांचे गुण समान राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपांत्य फेरीत प्रवेशाचा निर्णय नेट रन रेटच्या आधारे होणार असल्याने भारतीय संघासाठी आगामी सामना अत्यंत निर्णायक ठरणार आहे. भारताचा पुढील सामना 26 फेब्रुवारी रोजी चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर झिम्बाब्वेविरुद्ध खेळवला जाणार आहे.

हेही वाचा: Gold SIlver Rate Today: सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल; सराफ बाजारातील आजची स्थिती काय? जाणून घ्या आजचे ताजे दर

भारताने प्रथम फलंदाजी केल्यास नेट रन रेट सुधारण्यासाठी मोठ्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक ठरणार आहे. गणितानुसार किमान 77 किंवा त्याहून अधिक धावांनी विजय मिळाल्यास भारताचा रन रेट सकारात्मक दिशेने जाऊ शकतो. यासाठी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला कमी धावांत रोखणे गरजेचे असेल. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताने यापूर्वी अनेक वेळा मोठ्या फरकाने विजय मिळवले असल्यामुळे हे आव्हान अशक्य मानले जात नाही.

मात्र धावांचा पाठलाग करण्याची वेळ आल्यास समीकरण अधिक कठीण होऊ शकते. उदाहरणार्थ, झिम्बाब्वेने 150 धावांचे लक्ष्य दिल्यास भारताला ते सुमारे 13 षटकांत पूर्ण करणे आवश्यक ठरेल. तसेच 180 धावांचे आव्हान मिळाल्यास 14व्या षटकाच्या अखेरीपर्यंत लक्ष्य गाठणे भारतासाठी गरजेचे ठरणार आहे, अन्यथा नेट रन रेटमध्ये अपेक्षित सुधारणा होणे अवघड ठरेल.

सुपर-8 टप्प्यातील उर्वरित सामने आता भारतीय संघासाठी निर्णायक झाले आहेत. उपांत्य फेरीतील स्थान कायम राखण्यासाठी केवळ विजय पुरेसा नसून प्रभावी आणि मोठ्या फरकाचा विजय मिळवणे अनिवार्य बनले आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आता झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या या निर्णायक सामन्याकडे लागले आहे.

हेही वाचा: Baramati Bypoll Elections: बारामतीचा वारसदार ठरला! अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा वहिनी विधानसभेच्या रिंगणात, तर पार्थ पवारांना नवी जबाबदारी


सम्बन्धित सामग्री