India FTA Agreements: जागतिक व्यापारात भारताचे वर्चस्व झपाट्याने वाढत असून, देशाने आतापर्यंत 38 राष्ट्रांसोबत एकूण 9 मुक्त व्यापार करार (FTA) यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी या प्रगतीचा पाढा वाचताना सांगितले की, या करारांमुळे जगातील दोन तृतीयांश बाजारपेठांमध्ये भारतीय उत्पादनांना आता 'प्राधान्य' (Preferential Access) मिळत आहे.
नव्या करारांची घोडदौड
भारतीय वस्तू, सेवा आणि कृषी उत्पादनांना जागतिक स्तरावर हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सरकार आक्रमकपणे पावले उचलत आहे.
चिली (Chile): चिलीसोबतचा व्यापार करार याच आठवड्यात अंतिम टप्प्यात पोहोचण्याची शक्यता आहे.
कॅनडा (Canada): कॅनडासोबतच्या मुक्त व्यापार करारासाठी (FTA) वाटाघाटींची तयारी पूर्ण झाली असून, लवकरच यावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.
भारतीय टॅलेंट आणि AI चा प्रभाव
पीयूष गोयल यांनी भारतीय तरुणांच्या कौशल्याचे कौतुक करताना तंत्रज्ञानातील बदलांवरही भाष्य केले. भारत दरवर्षी सुमारे 2.3 दशलक्ष (23 लाख) विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) क्षेत्रातील पदवीधर तयार करतो, ज्यांच्याकडे जग आशेने पाहत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मुळे नोकऱ्या जाणार नाहीत, तर कामाचे स्वरूप बदलेल. सायबर सुरक्षा आणि डेटा संरक्षण यांसारख्या क्षेत्रांत कुशल भारतीयांची मागणी उलट वाढणार आहे, असंही गोयल यांनी नमूद केलं.
हेही वाचा - UK Travel Rules: लंडनला जायचंय ? मग मोजावे लागणार जास्तीचे पैसे; ब्रिटनचे नवीन 'प्रवास धोरण' नेमके काय आहे?
स्वावलंबी भारत म्हणजे काय?
पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले की, 'आत्मनिर्भर' होणे म्हणजे जगापासून वेगळे होणे नव्हे. उलट, विश्वासार्ह जागतिक भागीदारीद्वारे एक मजबूत पुरवठा साखळी निर्माण करणे, हेच भारताचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामुळे केवळ निर्यात वाढणार नाही, तर भारतीय प्रतिभेला जागतिक व्यासपीठही उपलब्ध होईल.