मुंबई: आर्थिक वर्षाची सांगता झाली की, करदात्यांची गडबड सुरू होते ती 'आयटीआर' (Income Tax Return, ITR) फाईल करण्यासाठी. एकदा का विवरणपत्र भरले की, मग डोळे लागतात ते हक्काच्या रिफंडकडे. "माझे पैसे कधी जमा होतील?" या विवंचनेत आपण वारंवार बँक खातं तपासत असतो. मात्र, तुमच्या याच अधीरतेचा फायदा घेण्यासाठी सायबर गुन्हेगार टपून बसले आहेत. "तुमचा टॅक्स रिफंड थांबवला आहे, त्वरित अपडेट करा," अशा एका मेसेजवरची तुमची एक छोटीशी 'क्लिक' तुमच्या कष्टाच्या कमाईवर पाणी फेरू शकते.
प्रतीक्षेचा फायदा आणि भीतीचा व्यापार
सध्या आयटीआर रिफंड प्रक्रियेत होणाऱ्या तांत्रिक विलंबाचा फायदा सायबर ठग घेत आहेत. प्राप्तिकर विभागाच्या नावाखाली हुबेहूब दिसणारे बनावट एसएमएस (SMS) आणि ईमेल पाठवले जात आहेत. यात 'तात्काळ कारवाई न केल्यास दंड आकारला जाईल' अशी धमकीवजा सूचना असते. घाईघाईत आणि भीतीपोटी करदाता त्या लिंकवर क्लिक करतो. नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेत, अशाच एका बनावट लिंकवर माहिती भरल्यामुळे एका करदात्याला तब्बल दीड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान क्षण करावे लागले आहे. हे गुन्हेगार केवळ पैसेच चोरत नाहीत, तर तुमच्या पॅन कार्ड आणि बँक खात्याची गोपनीय माहितीही लंपास करत आहेत.
रिफंडला उशीर का होतो?
अनेकदा करदात्यांच्या मनात प्रश्न असतो की, सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही पैसे का येत नाहीत? प्राप्तिकर विभागाच्या नियमांनुसार, रिफंड जारी करण्यापूर्वी 'डेटा मॅचिंग'ची कठोर प्रक्रिया पार पडते. तुमच्या दाव्यांची आणि विभागाकडे असलेल्या माहितीची पूर्ण पडताळणी झाल्याशिवाय रिफंड दिला जात नाही. त्यातच जर तुमचे बँक खाते 'प्री-व्हॅलिडेट' नसेल किंवा माहितीत थोडीही तफावत असेल, तर ही प्रक्रिया लांबणीवर पडते. हीच अनिश्चितता सायबर चोरांसाठी 'हथियार' बनत आहे.
हेही वाचा: Helicopter Crash: भयंकर ! बघता बघता समुद्रातच कोसळलं हेलिकॉप्टर ; 7 जणांचा...
बनावट वेबसाइट्सचा 'मायाजाल'
सायबर गुन्हेगारांची कार्यपद्धती अत्यंत चलाख असते. ते पाठवत असलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर उघडणारे पेज हे अधिकृत सरकारी वेबसाइटसारखेच दिसते. तिथे तुमचा पॅन नंबर, आधार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ओटीपी (OTP) विचारला जातो. एकदा का तुम्ही हा 'डिजिटल उंबरठा' ओलांडला की, तुमच्या बँक खात्याची चावी चोरांच्या हाती लागते. प्राप्तिकर विभागाने स्पष्ट शब्दांत बजावले आहे की, विभाग कधीही वैयक्तिक माहिती, पिन किंवा ओटीपी एसएमएसद्वारे मागत नाही.
सुरक्षेची 'पंचसूत्री'; सतर्कता हाच बचाव
तुमचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी खालील पाच नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.
1. अधिकृत पोर्टल: रिफंड स्टेटस पाहण्यासाठी केवळ www.incometax.gov.in याच अधिकृत संकेतस्थळाचा वापर करा.
2. तक्रार करा: असा मेसेज आल्यास तात्काळ सायबर पोलिसांकडे किंवा विभागाच्या अधिकृत हँडलवर तक्रार नोंदवा.
3. गोपनीयता: आपला ओटीपी किंवा बँक पासवर्ड कोणालाही, कधीही सांगू नका.
4. संयम ठेवा: 'तात्काळ कारवाई'च्या मेसेजला बळी पडू नका; विभाग अधिकृत डॅशबोर्डवरच सूचना देतो.
5. बनावट लिंक: अनोळखी नंबरवरून आलेल्या कोणत्याही लिंकला स्पर्शही करू नका.
थोडक्यात पण महत्त्वाचे...
ऑनलाइन व्यवहार करताना 'अति घाई संकटात नेई' ही म्हण तंतोतंत लागू होते. रिफंड मिळायला थोडा उशीर झाला तरी चालेल, पण चुकीच्या लिंकवर क्लिक करून आयुष्यभराची पुंजी गमावणे कधीही परवडणारे नाही. डिजिटल युगात 'सतर्कता' हाच तुमचा सर्वात मोठा विमा आहे. लक्षात ठेवा, प्राप्तिकर विभाग तुम्हाला पैसे देण्यासाठी बसला आहे, तुमचे पैसे चोरण्यासाठी नाही. त्यामुळे फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा.
हेही वाचा: State Name Change: नावबदलाच्या उंबरठ्यावर दक्षिणेतील महत्त्वाचे राज्य; कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय शक्य