Tirupati Laddu Row: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या तिरुमला लाडू प्रसादम तूप भेसळ प्रकरणात अखेर मोठी कारवाई झाली आहे. सीबीआयच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने (SIT) नेल्लोर येथील एसीबी (ACB) न्यायालयात आपले अंतिम आरोपपत्र दाखल केले आहे. सुमारे 15 महिन्यांच्या प्रदीर्घ तपासानंतर हे पाऊल उचलण्यात आले असून, यामध्ये धक्कादायक नावे समोर आली आहेत. तपासादरम्यान 12 राज्यांमध्ये धागेदोरे शोधल्यानंतर, उत्तराखंडमधील भोले बाबा ऑरगॅनिक डेअरी हे या मोठ्या फसवणुकीचे केंद्र असल्याचे निष्पन्न झाले आहे. या डेअरीचे संचालक पोमिल जैन आणि विपिन जैन यांना मुख्य कट रचणारे म्हणून नाव देण्यात आले आहे. पाम तेल आणि घातक रसायनांचा वापर करून बनावट तूप तयार केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
तक्रारदारच निघाला आरोपी
या प्रकरणातील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे, टीटीडीचे निवृत्त महाव्यवस्थापक (खरेदी) आणि या प्रकरणातील मूळ तक्रारदार प्रलय कावेरी मुरली कृष्णा यांचे नाव आता आरोपींच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यांच्यासोबतच माजी प्रोक्योरमेंट जनरल मॅनेजर आरएसएसव्हीआर सुब्रमण्यम यांनाही पुरवठादारांशी संगनमत केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.
मुख्य आरोपींची यादी आणि आरोप
अंतिम आरोपपत्रात एकूण 36 मुख्य आरोपींचा समावेश आहे. त्यातील काही प्रमुख नावे खालीलप्रमाणे आहेत:
पोमिल जैन आणि विपिन जैन: भोले बाबा ऑरगॅनिक डेअरीचे संचालक (मुख्य कट रचणारे).
चिन्ना अप्पाना: माजी टीटीडी अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी यांचे वैयक्तिक सहाय्यक.
अपूर्व विनायकांत चावडा: सीईओ, वैष्णवी डेअरी.
आर. राजशेखरन: एमडी, एआर डेअरी.
अजय कुमार सुगंध: दिल्लीतील व्यापारी (केमिकल पुरवठादार).
250 कोटींचा 'बनावट' व्यवहार
तपासात असे उघड झाले आहे की, 2019 ते 2024 दरम्यान सुमारे 6.8 दशलक्ष किलो भेसळयुक्त तूप टीटीडीच्या पुरवठा साखळीत पाठवण्यात आले होते. यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाऐवजी पाम तेल, पाम कर्नल ऑइल आणि रासायनिक पदार्थांचा वापर करण्यात आला होता. या एकूण व्यवहाराचे मूल्य अंदाजे 250 कोटी इतके आहे.
हेही वाचा - Crime News : अंक लिहू शकली नाही बिचारी! निर्दयी बापाने स्वत:च्याच चार वर्षीय लेकीला संपवलं, आईने पाहिलं आणि...
मोठ्या नावांना दिलासा
तपास पथकाने टीटीडीचे माजी अध्यक्ष आणि वायएसआरसीपी खासदार वाय.व्ही. सुब्बा रेड्डी तसेच माजी अतिरिक्त कार्यकारी अधिकारी ए.व्ही. धर्मा रेड्डी यांची चौकशी केली असली, तरी त्यांना अंतिम आरोपपत्रात आरोपी म्हणून नाव देण्यात आलेले नाही. सप्टेंबर 2024 मध्ये मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी लाडू प्रसादात भेसळयुक्त तूप वापरल्याचे जाहीर केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. प्राण्यांची चरबी आणि डुकराची चरबी वापरल्याच्या दाव्यांमुळे देशभरातील भाविकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त झाला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयच्या नेतृत्वाखालील पथकाने या तपासाची चक्रे फिरवली होती.