दिल्ली बॉम्बस्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून चर्चा केली. दिल्लीतील बॉम्बस्फोटांनंतरच्या परिस्थितीचा पंतप्रधान मोदींनी आढावा घेतला.
सोमवारी संध्याकाळी ६:५२ वाजता दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एका चालत्या कारमध्ये स्फोट झाला. त्यानंतर अनेक कारना आग लागली आणि त्यांचे मोठे नुकसान झाले.त्यामुळे आता मुंबई सह सर्व ठिकाणच्या यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.
दिल्ली बॉम्बस्फोटांबाबत पोलिस आयुक्त सतीश गोलचा यांनीही एक निवेदन जारी केले आहे. माध्यमांशी बोलताना दिल्ली पोलिस आयुक्त गोलचा म्हणाले, "आज संध्याकाळी ६:५२ वाजताच्या सुमारास, एक संथ गतीने जाणारे वाहन लाल सिग्नलवर थांबले. "वाहनाचा स्फोट झाला, ज्यामुळे जवळच्या वाहनांचे नुकसान झाले. एफएसएल आणि एनआयए टीमसह सर्व तपास संस्था घटनास्थळी पोहोचल्या आहेत. काही लोकांचा मृत्यू झाला आहे आणि काही जण जखमी झाले आहेत. परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे."
गोलचा पुढे म्हणाले की, गृहमंत्री अमित शहा यांनीही आम्हाला फोन केला आहे. वेळोवेळी त्यांच्याशी माहिती शेअर केली जात आहे. घटनेनंतर लगेचच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलिस आयुक्तांशी चर्चा केली.