Monday, March 09, 2026 08:17:01 AM

IND vs PAK: हस्तांदोलन नाहीच! नाणेफेक दरम्यान कॅप्टन सूर्याने कायम राखलं भारताचं 'नो हँडशेक' धोरण

भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेकीच्या वेळी पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा याच्याशी हस्तांदोलन करण्यास नकार देत भारताचे 'नो हँडशेक' धोरण कायम ठेवले आहे.

ind vs pak हस्तांदोलन नाहीच नाणेफेक दरम्यान कॅप्टन सूर्याने कायम राखलं भारताचं नो हँडशेक धोरण

IND vs PAK:  टी-20 विश्वचषक 2026 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर सुरू झाला आहे. मात्र, खेळापूर्वीच एका घटनेने क्रीडा विश्वात खळबळ उडवून दिली आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेकीच्या वेळी पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा याच्याशी हस्तांदोलन करण्यास नकार देत भारताचे 'नो हँडशेक' धोरण कायम ठेवले आहे.

नाणेफेकीचा कौल आणि भारताचे दोन मोठे बदल
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेकीवेळी सूर्यकुमार यादव म्हणाला की, "आम्हाला प्रथम फलंदाजीच करायची होती. गेल्या दोन सामन्यांत आम्ही धावसंख्येचा यशस्वी बचाव केला आहे, त्यामुळे त्या रणनीतीत बदल करण्याची गरज वाटत नाही." भारतीय संघात आज दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यष्टिरक्षक संजू सॅमसन ऐवजी अभिषेक शर्मा याला संधी देण्यात आली आहे, तर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या जागी फिरकीपटू कुलदीप यादवचे संघात पुनरागमन झाले आहे.

हस्तांदोलन नाकारले; पाकिस्तानी कर्णधाराकडे दुर्लक्ष
नाणेफेक पार पडल्यानंतर अपेक्षेप्रमाणे सूर्यकुमार यादवने हस्तांदोलन टाळले. त्याने सलमान आगाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि टॉस प्रेझेंटरशी बोलून तो थेट आपल्या डगआउटच्या दिशेने निघून गेला. पाकिस्तानी कर्णधार हस्तांदोलनासाठी पुढे सरसावला होता, मात्र सूर्याच्या भूमिकेमुळे त्याला रिकाम्या हाताने परतावे लागले. भारतीय कर्णधाराच्या या कृतीने मैदानातील तणाव अधिकच वाढल्याचे दिसून आले.

'नो हँडशेक' धोरणामागची पार्श्वभूमी
भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचे धोरण 2025 च्या आशिया चषकापासून सुरू केले आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हापासून भारताच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन्ही संघांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांत हात न मिळवण्याचा नियम पाळला आहे. सामन्यापूर्वी सलमान आगाने "खेळ हा खेळाच्या भावनेने खेळला जावा" असे विधान केले होते, मात्र भारताने आपल्या भूमिकेवर ठाम राहणे पसंत केले. तथापी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी भारताच्या 'नो हँडशेक' धोरणाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) दाद मागितली होती. "जर भारतीय संघ हस्तांदोलन करण्यास नकार देत असेल, तर आम्ही विश्वचषकातील पुढील सामन्यांवर बहिष्कार टाकू," असा पवित्रा पाकिस्तानने घेतला होता. मात्र, पाकिस्तानची ही धमकीवजा मागणी आयसीसीने पूर्णपणे फेटाळून लावली आहे. आयसीसीने स्पष्ट शब्दात सुनावले की, मैदानावर हस्तांदोलन करणे किंवा न करणे हा सर्वस्वी त्या-त्या देशाच्या क्रिकेट बोर्डाचा आणि संघाचा वैयक्तिक निर्णय आहे. हा मुद्दा आयसीसीच्या नियमावलीत किंवा अधिकारक्षेत्रात येत नाही. यामुळे या वादात पाकिस्तानची कोंडी झाली.  

हेही वाचा - IND vs PAK Match: हायव्होल्टेज सामन्याची थरारक सुरुवात; टॉस जिंकताच पाकिस्तानचा मोठा डाव, भारतासमोर आव्हान

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया: इशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह. (राखीव: अर्शदीप सिंग, संजू सॅमसन, मोहम्मद सिराज).

पाकिस्तान संघ: सैम अयुब, साहिबजादा फरहान, सलमान आगा (कर्णधार), बाबर आझम, मोहम्मद नवाज, शादाब खान, फहीम अश्रफ, उस्मान खान (यष्टीरक्षक), शाहीन आफ्रिदी, अबरार अहमद, उस्मान तारिक, फखर जमान, नसीम शाह.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या