Wednesday, May 21, 2025 01:36:09 PM

भारताचं सर्जिकल प्रत्युत्तर; ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेचा देशभरात जल्लोष

ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कारवाईनंतर देशात जल्लोष; येवल्यात माजी सैनिकांनी पुन्हा सीमेसाठी सज्ज असल्याची भावनिक तयारी व्यक्त केली.

भारताचं सर्जिकल प्रत्युत्तर ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेचा देशभरात जल्लोष

नवी दिल्ली: भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा बदला घेतला. या धाडसी कारवाईमुळे संपूर्ण देशभरात अभिमान, देशभक्ती आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध राज्यांतील नागरिक, राजकीय पक्ष, माजी सैनिक आणि सामाजिक संघटनांनी रस्त्यावर उतरून फटाके फोडत, मिठाई वाटत आणि घोषणा देत भारतीय सेनेच्या या यशाचे जल्लोषात स्वागत केले.

नाशिक जिल्ह्यातील येवल्यात माजी सैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ऑपरेशन सिंदूरचं स्वागत केलं. जर युद्धजन्य परिस्थिती उद्भवली, तर आम्ही पुन्हा सीमेसाठी सज्ज आहोत. भारत सरकारने केव्हाही बोलावावं, आम्ही तत्पर आहोत, असं भावनिक वक्तव्य या माजी जवानांनी केलं.येवला व्यापारी महासंघाने खांबेकर खुंटावर फटाक्यांची आतषबाजी करत विजयाच्या घोषणा दिल्या. ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे भारतीय लष्कराचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांच्या धाडसाला सलाम करण्यासाठी व्यापाऱ्यांनी जल्लोष साजरा केला.

सिंधुदुर्गातील कुडाळ शहरात जिजामाता चौकात नागरिकांनी एकत्र येऊन फटाके फोडले. सांगलीत शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्तानकडून फटाके व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. जालन्यात काँग्रेस कमिटीने शिवाजी महाराज चौकात जल्लोष केला. पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकांनी मिठाई वाटून 'भारत माता की जय'च्या घोषणांनी आसमंत दणाणवून टाकला.

हेही वाचा: काश्मीरमधील हल्ल्यानंतर देशात अस्वस्थता; परंतु भारत ठामपणे उभा

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात खासदार रविंद्र वायकर यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मिठाई वाटून ऑपरेशन सिंदूरचं यश साजरं करण्यात आलं. यावेळी लष्कराच्या कौशल्याचं व सरकारच्या निर्णयाचं कौतुक करण्यात आलं.

मुंबईतील मुलुंडमध्ये भाजप आमदार मिहिर कोटेचा आणि नागरिकांनी लाडू व पेढे वाटून आनंद साजरा केला. बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत ऑपरेशन सिंदूरचे स्वागत केले.

 'हिंदुस्थान जिंदाबाद' च्या घोषणा आणि देशभक्तीचा अभिमान
या यशस्वी एअर स्ट्राईकनंतर देशात हिंदुस्थान जिंदाबाद, भारत माता की जय आणि वंदे मातरम अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले आहे. सोशल मीडियावरही नागरिकांनी भारतीय लष्कराचे आभार मानत, जयजयकार केला आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ एक सैनिकी कारवाई नव्हती, तर ती भारताच्या दृढ निर्धाराची, आत्मरक्षणाची आणि जागतिक स्तरावरील स्पष्ट भूमिका मांडणारी मोहीम ठरली. भारतीय लष्कराच्या या पराक्रमामुळे संपूर्ण देश एकवटला आहे. प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर अभिमानाचे तेज दिसून येत आहे. भारताने आपल्या वीर जवानांच्या धाडसाचे आणि देशप्रेमाचे दर्शन घडवत पुन्हा एकदा सिद्ध केले. शांततेची इच्छा असली तरी युद्ध टाळता येत नाही, तर आपण सज्ज आहोत. 


सम्बन्धित सामग्री