नवी दिल्ली: पाहलगाममधील अमानवी हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त
करत ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पार पाडले. मध्यरात्री दीडच्या सुमारास भारतीय वायुदलाने हवेतून अचूक स्ट्राईक करत नऊ दहशतवादी छावण्यांचा नायनाट केला. ही कारवाई केवळ अतिरेक्यांच्या ठिकाणांवर केंद्रित होती, जेणेकरून कोणताही निष्पाप पाकिस्तानी नागरिक अथवा लष्करी ठिकाण लक्ष्य ठरणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. या महत्त्वपूर्ण ऑपरेशनमुळे दहशतवाद्यांना मोठा फटका बसला आहे.
ऑपरेशनमध्ये भारतीय सेनेने जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाचा समावेश असलेल्या बहावलपूरमधील तळ नष्ट केला. त्याचबरोबर कोटली आणि मुझफ्फराबादमधील अन्य तळांवरही लक्ष्य साधण्यात आले. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ वायुदलाची कारवाई नव्हे, तर यामध्ये भारतीय सैन्य आणि नौदलाचाही सहभाग होता. तीनही दलांनी एकत्रितपणे ही रणनीती आखून ही कारवाई केली. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या मदतीने अतिरेक्यांचे अड्डे उध्वस्त करत भारताने जागतिक पातळीवर आपली दहशतवादविरोधी भूमिका पुन्हा अधोरेखित केली.
या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून प्रतिक्रिया देण्यात आली. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतावर ‘भ्याड हल्ल्यांचे’ आरोप करत सोशल मीडियावर प्रतिक्रिया नोंदवली. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानच्या भूमीवर झालेल्या हल्ल्यांना गंभीर पातळीवर प्रत्युत्तर दिलं जाईल. त्यांनी दावा केला की, पाकिस्तानचं सैन्य आणि जनता या संकटाच्या वेळी एकवटली असून कोणत्याही विरोधकाचा हेतू यशस्वी होऊ दिला जाणार नाही.
शाहबाज शरीफ यांनी पुढे सांगितलं की, पाकिस्तानला अशा प्रकारच्या युद्धजन्य परिस्थितींचा अनुभव असून, ते देशाच्या सुरक्षेसाठी शेवटपर्यंत लढतील. मात्र, भारताच्या या ऑपरेशनमधून स्पष्ट झालं की, दहशतवादाला थारा देणाऱ्यांविरुद्ध आता भारत अधिक कठोर आणि निर्णायक भूमिका घेत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलं की, देशाच्या सुरक्षिततेवर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही, आणि त्याचे उत्तर नेहमीच ठोस कृतीतून दिलं जाईल.