पहलगाम: पहलगाममध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्याने देशाला हादरवून सोडलं आहे. या हल्ल्यात 27 निरपराध पर्यटकांचे प्राण गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सऊदी अरेबियाची अधिकृत भेट अर्धवट सोडून तातडीने परत येत संरक्षण समितीची बैठक घेतली आणि या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध केला.
या हल्ल्यामुळे पाकिस्तानवर पुन्हा एकदा संशयाचं सावट पडलं आहे. जागतिक नेत्यांनी देखील या हिंसेचा निषेध करत दहशतवादाविरुद्ध एकत्र उभं राहण्याचं आवाहन केलं. भारत आणि सौदीत अरेबियाने यावर संयुक्त निषेध करत दहशतवाद हे मानवतेसमोरील सर्वात मोठं संकट आहे, असं सांगितलं आहे . कोणत्याही धर्माशी त्याला जोडणं चुकीचं आहे, असंही दोन्ही देशांनी म्हटलं.
हल्ला अशा वेळी झाला, जेव्हा काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत होती, पर्यटन फुलत होतं, आणि थेट दिल्लीहून रेल्वेसेवा सुरू होण्याच्या बातम्यांनी आनंदाचं वातावरण होतं. हीच स्थिरता उध्वस्त करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता. विशेषतः पर्यटकांना लक्ष्य करणं ही दहशतीची नवी पातळी आहे. त्यामुळे काश्मीरमधील पर्यटन व्यवसाय धोक्यात आला असून, बुकिंग्स रद्द होत आहेत.
हेही वाचा :पाहलगाममध्ये भीषण दहशतवादी हल्ला : 27 पर्यटकांचा मृत्यू, तीन दहशतवाद्यांचे स्केच प्रसिद्ध
मात्र या वेळी परिस्थितीत सकारात्मक बाजूही दिसून आली. काश्मिरी समाजाने दहशतवादाविरोधात आपली भूमिका उघडपणे मांडली. मस्जिदीतून निषेधाचे आवाज उमटले, रस्त्यांवर लोक उतरले आणि माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनी देशाची माफी मागितली. यामुळे हे स्पष्ट झालं की हा हल्ला सीमापार कटाचा भाग होता, पण स्थानिकांचा पाठिंबा त्याला नाही.
हल्ल्याच्या वेळेबाबतही प्रश्न निर्माण होतो . अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारतात असताना आणि पंतप्रधान मोदी सौदीत असताना हल्ला घडवून आणणं हा केवळ योगायोग होता का? गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीर दौऱ्यावर जाऊन अतिरेक्यांना कठोर शिक्षा दिली जाईल असं जाहीर केलं. सध्या काश्मीरमध्ये अंदाजे 100 अतिरेकी सक्रिय असून त्यातील 90 टक्के सीमापारचे आहेत.
अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवरही सुरक्षा यंत्रणांपुढे मोठं आव्हान उभं राहिलं आहे. यामध्ये स्थानिक दहशतवाद्यांचा सहभाग होता का, याचा तपास होणं गरजेचं आहे. अशा हल्ल्यामुळे काश्मिरी समाजाविरुद्ध रोष वाढू शकतो, म्हणून सरकारने खरे गुन्हेगार शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.दहशतवाद ही मानवतेविरोधातील सर्वात मोठी लढाई आहे. आपल्याला मिळून या अतिरेक्यांचा नायनाट करावा लागेल. शांतता, प्रगती आणि सुरक्षिततेचा मार्ग खुला ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे.