PM Modi Malaysia Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मलेशियाच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर असून रविवारी क्वालालंपूर येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. विमानतळावर मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी त्यांचे स्वागत केले, त्यानंतर 'पेरदाना पुत्र' येथे पंतप्रधान मोदींना 'गार्ड ऑफ ऑनर' देऊन सन्मानित करण्यात आले. या औपचारिक स्वागत समारंभासाठी लाल गालिचा अंथरण्यात आला होता. भारत आणि मलेशियाच्या सामायिक सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेले पारंपारिक संगीत आणि नृत्य यावेळी सादर करण्यात आले, ज्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
मंत्र्यांची भेट आणि तमिळ संस्कृतीचे कौतुक
या सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी मलेशियाचे मानव संसाधन मंत्री रमनन रामकृष्णन आणि उपपरराष्ट्र मंत्री लुकानिस्मान बिन अवांग सौनी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. या उबदार स्वागताने भारावलेले पंतप्रधान मोदी म्हणाले की, "भारत आणि मलेशिया विश्वास, मैत्री आणि सामायिक आकांक्षांवर आधारित आपली भागीदारी सतत मजबूत करत आहेत." विशेष म्हणजे, 'मलेशिया हिंदू संगम'च्या विद्यार्थ्यांनी यावेळी 'तिरुमुराई'मधील भक्तिगीते सादर केली. यावर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियाद्वारे मलेशियातील तमिळ समुदायाचे कौतुक करताना म्हटले की, त्यांनी आपली संस्कृती आणि परंपरा अतिशय अभिमानाने जपल्या आहेत.
हेही वाचा - PM Modi On Pakistan: 'नो डबल स्टँडर्ड, नो कॉम्प्रोमाइज'; पाकिस्तानवर निशाणा साधत मोदींचे खडेबोल
पंतप्रधान मोदी आणि अन्वर इब्राहिम यांच्यातील चर्चेचा अजेंडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्यात रविवार, 8 फेब्रुवारी रोजी महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा पार पडणार आहे. या चर्चेमध्ये दोन्ही देशांमधील सहकार्य वाढवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारत या बैठकीत वादग्रस्त इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा पुन्हा एकदा लावून धरण्याची शक्यता आहे. या मुद्द्याकडे दोन्ही देशांच्या राजनैतिक वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.
संरक्षण आणि आर्थिक भागीदारीवर विशेष भर
दौऱ्यापूर्वी दिलेल्या निवेदनात पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले की, या भेटीचा मुख्य उद्देश संरक्षण सहकार्य अधिक दृढ करणे आणि आर्थिक भागीदारीला नवीन गती देणे हा आहे. ते म्हणाले, "आम्ही संरक्षण आणि सुरक्षा संबंधांसोबतच नाविन्यपूर्ण क्षेत्रांतही सहकार्य वाढवणार आहोत." परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, या दौऱ्याचा अजेंडा व्यापक असून यामुळे भारत-मलेशिया यांच्यातील विशेष संबंधांना मोठी चालना मिळेल. मलेशियात सुमारे 29 लाख भारतीय वंशाचे लोक राहतात, जे दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि सभ्यताविषयक संबंधांचा मजबूत कणा आहेत.