Narendra Modi in Bihar : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. भारतीय जनता पार्टीने मुझफ्फरपूर येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी देशातील दोन मोठ्या नेत्यांवर जोरदार टीका (Narendra Modi Speech in Bihar for Assembly Election 2025) केली. ते म्हणाले, “देशातील दोन मोठ्या प्रस्थापित आणि भ्रष्ट कुटुंबांमधील युवराज सतत मला शिव्या देत असतात. गरिब कुटुंबातून आणि मागासवर्गीय समाजातून पुढे आलेला व्यक्ती त्यांना बघवत नाही.”
मोदींच्या निशाण्यावर 'युवराजांची जोडी'
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात कोणाचेही नाव घेतले नाही, परंतु त्यांचा रोख लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याकडे होता, असे मानले जात आहे. त्यांनी 'देशातील प्रस्थापित' आणि 'बिहारमधील प्रस्थापित' कुटुंबातील युवराज असा उल्लेख केला.
मोदी म्हणाले की, "बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात दोन युवकांची जोडी तयार झाली आहे, हे दोघे स्वतःला युवराज (राजपुत्र) मानतात. या दोघांनी खोट्या आश्वासनांची दुकाने उघडली आहेत."
हेही वाचा - New CJI: भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती; 24 नोव्हेंबरला स्वीकारणार पदभार
'जामिनावर बाहेर आलेले युवराज'
पंतप्रधान मोदींनी या दोघांवर हजारो कोटी रुपयांचे घोटाळे केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "या दोघांनी हजारो कोटी रुपयांचे घोटाळे केले आहेत आणि सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. आपल्या गावाकडे अशा लोकांना किंमत नसते. जामिनावर घरी आलेल्या व्यक्तीला सन्मान दिला जात नाही."
"कामदाराला शिव्या दिल्याशिवाय नामदारांना अन्न पचत नाही"
या दोन्ही युवराजांनी आपल्याला खूप शिव्या दिल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केला. ते म्हणाले, "या नामदार (प्रस्थापित) लोकांना माझ्यासारख्या कामदाराला शिव्या दिल्याशिवाय खाल्लेले अन्न पचत नाही."
मोदींनी पुढे म्हटले की, हे युवराज दलित आणि मागासवर्गीयांना शिव्या देणे आपला जन्मसिद्ध अधिकार समजतात आणि म्हणूनच ते मला 24 तास शिव्या देत असतात. "एकेकाळी चहा विकणारा माणूस इथपर्यंत पोहोचला आहे, हे त्यांना सहन होत नाही," असे म्हणत मोदींनी आपला मागासवर्गीय आणि गरीब कुटुंबातील असल्याचा उल्लेख केला आणि त्यांच्या टीकेमागे याच गोष्टीचा द्वेष आहे, असे स्पष्ट केले.
हेही वाचा - Piyush Goyal: पीयूष गोयल यांचा उद्योग प्रतिनिधींशी संवाद; ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’वर भर