भारताने रावी नदीचे अतिरिक्त पाणी पाकिस्तानकडे जाण्यापासून रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पंजाब- जम्मू-काश्मीर सीमेवरील शाहपूर कंडी धरणाचे काम अंतिम टप्प्यात असून 31 मार्च 2026 पर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. धरण पूर्ण झाल्यानंतर रावीचे उर्वरित पाणी पाकिस्तानकडे न जाता जम्मू-काश्मीरमधील कठुआ, सांबा तसेच पंजाबमधील कोरडवाहू भागांच्या सिंचनासाठी वापरले जाणार आहे.
जम्मू-काश्मीरचे जलसंपदा मंत्री जावेद अहमद राणा यांनी स्पष्ट केले की, “रावीचे अतिरिक्त पाणी पाकिस्तानला जाण्यापासून रोखणे आवश्यक आहे.” त्यांच्या मते, कठुआ आणि सांबा हे जिल्हे दीर्घकाळ दुष्काळी परिस्थितीचा सामना करत आहेत आणि हा प्रकल्प त्या भागांसाठी जीवनदायिनी ठरेल.
या प्रकल्पामुळे जम्मू-काश्मीरमधील कठुआ आणि सांबा जिल्ह्यांतील 32,173 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. पंजाबमध्ये सुमारे 5,000 हेक्टर अतिरिक्त क्षेत्राला पाणी उपलब्ध होईल. एकूण 37,000 हेक्टरपेक्षा अधिक शेतीला लाभ मिळणार असून, जलविद्युत निर्मितीलाही चालना मिळेल. केंद्र सरकारने सिंचन घटकासाठी 485 कोटी 38 लाख रुपयांची मंजुरी दिली आहे. यामुळे माधोपुर हेडवर्क्समार्गे पाकिस्तानकडे वाहून जाणाऱ्या पाण्याची नासाडी थांबेल.
हेही वाचा: Crime News: आधी शारीरिक सुखाची मागणी; नकार मिळताच तरुणीला संपवलं अन् मग मृतदेहासोबत...
1960 च्या सिंधू जल करारानुसार भारताला रावी, बियास आणि सतलज या पूर्वेकडील नद्यांवर पूर्ण अधिकार आहे. मात्र तांत्रिक मर्यादा आणि साठवण सुविधांचा अभाव यामुळे रावीचे मोठे प्रमाण पाकिस्तानात वाहून जात होते. शाहपूर कंडी प्रकल्प हा कराराच्या चौकटीतच असून भारताच्या हक्कातील पाण्याचा प्रभावी वापर करण्यासाठी उभारला जात आहे.
या प्रकल्पाची सुरुवात 2001 मध्ये झाली होती, परंतु पंजाब आणि जम्मू-काश्मीर यांच्यातील वादामुळे काम ठप्प झाले. 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपानंतर तोडगा निघाला आणि प्रकल्पाला गती मिळाली. सध्या ‘मिशन मोड’मध्ये काम सुरू असून निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
पाकिस्तान आधीच जलसंकटाचा सामना करत आहे. रावीचे उर्वरित पाणी रोखल्यास त्याच्या खालच्या प्रवाहातील भागांवर परिणाम होऊ शकतो. एप्रिल 2025 मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार तात्पुरता स्थगित केला, डेटा शेअरिंग बंद केले आणि दहशतवादाबाबत कठोर भूमिका घेतली. त्यामुळे रावीचे पाणी अडवणे हे नैसर्गिक संसाधनांचा पूर्ण उपयोग आणि प्रादेशिक विकासाबरोबरच धोरणात्मक दृष्टीनेही महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
हेही वाचा: Non Bailable Warrant: राजपाल यादवपाठोपाठ 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ; मुरादाबाद न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी