UGC Fake Universities List : देशातील उच्च शिक्षण क्षेत्रावर नियंत्रण ठेवणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) 12 राज्यांमध्ये पसरलेल्या तब्बल 32 बनावट विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. या संस्थांना 'यूजीसी कायदा, 1956' अंतर्गत कोणतीही मान्यता नसून त्यांना पदवी देण्याचा कायदेशीर अधिकार नाही. या बनावट संस्थांनी दिलेली कोणतीही पदवी नोकरीसाठी किंवा पुढील शिक्षणासाठी ग्राह्य धरली जाणार नाही, असा कडक इशारा आयोगाने दिला आहे. विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान आणि करिअर उद्ध्वस्त होऊ नये म्हणून कोणत्याही संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी यूजीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर पडताळणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिल्ली बनले बनावट विद्यापीठांचे केंद्र
मिळालेल्या माहितीनुसार, देशाची राजधानी दिल्लीमध्ये बनावट विद्यापीठांची संख्या सर्वाधिक म्हणजे 12 इतकी आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील संस्थांचा समावेश आहे:
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्सेस (AIIPHS), अलिपूर.
कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, दर्यागंज.
युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी आणि विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी.
वर्ल्ड पीस ऑफ युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी (WPUNU), पितामपुरा.
राजधानीत अशा संस्थांचे पेव फुटल्याने शिक्षण वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे.
दोन वर्षांत बनावट संस्थांच्या संख्येत मोठी वाढ
गेल्या दोन वर्षांत बनावट संस्थांचा आकडा 20 वरून थेट 32 वर पोहोचला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आतापर्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या हरियाणा, राजस्थान, झारखंड आणि अरुणाचल प्रदेश सारख्या राज्यांमध्येही प्रत्येकी एक बनावट विद्यापीठ आढळले आहे. आयोगाने बेंगळुरूमधील 'ग्लोबल ह्यूमन पीस युनिव्हर्सिटी'बाबत विशेष इशारा दिला असून, त्यांना विद्यापीठ म्हणून काम करण्याचा कोणताही हक्क नसल्याचे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - Maharashtra Student ISRO Tour: 'आम्ही पाहिलं अंतराळाचं विश्व' ; विद्यार्थ्यांची 'इस्रो'त भरारी, 'मुख्यमंत्री विज्ञान प्रदर्शनी योजना' ठरतेय विद्यार्थ्यांसाठी गेमचेंजर
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ
शिक्षण तज्ज्ञांच्या मते, या बनावट संस्थांकडे कोणत्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा, पात्र प्राध्यापक किंवा शैक्षणिक मानकं नसतात. केवळ नफा कमावण्यासाठी या संस्था विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहेत. अशा संस्थांची पदवी मिळवूनही ती कुठेही वैध ठरत नसल्याने विद्यार्थ्यांचा पैसा आणि वेळ दोन्ही वाया जात आहे. त्यामुळे कोणत्याही जाहिरातीला बळी न पडता मान्यता तपासूनच प्रवेश घेणे हिताचे ठरेल.