Thursday, May 22, 2025 06:55:38 PM

पहलगाम हल्ल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर,पर्यटकाच्या कॅमेऱ्यात नकळत कैद झाला गोळीबाराचा थरार

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा थरार आता एका धक्कादायक व्हिडीओमधून समोर आला आहे.

पहलगाम हल्ल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोरपर्यटकाच्या कॅमेऱ्यात नकळत कैद झाला गोळीबाराचा थरार

जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा थरार आता एका धक्कादायक व्हिडीओमधून समोर आला आहे. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. हा व्हिडीओ अहमदाबादमधील पर्यटक ऋषी भट्ट यांनी नकळत आपल्या कॅमेऱ्यात शूट केला असून, हल्ल्याच्या सातव्या दिवशी तो समोर आला आहे. देशभरातून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या हल्ल्याचा तीव्र निषेध होत असतानाच, हा व्हिडीओ त्या क्षणातील भयावहता पुन्हा जिवंत करताना पाहायला मिळतंय. 

ऋषी भट्ट या पर्यटकाने ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितले की, 'मी झिपलाईन राईड घेत असताना व्हिडीओ सहजगत्या शूट करत होतो. गोळीबार सुरु असल्याचं मला तेव्हा कळलंच नाही. मात्र, अचानक काही लोक गोळी लागून खाली पडताना दिसले आणि भीतीने अंग थरथरू लागले.' ऋषी भट्ट यांचा अहमदाबादमध्ये इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे आणि ते आपल्या पत्नी भक्ती आणि मुलगा प्रीतसोबत सुट्टीसाठी काश्मीरला गेले होते.

जम्मू-हेही वाचा: काश्मीरमधील 48 पर्यटनस्थळं तात्पुरती बंद, तिथे जाणं झाल्यास आता फिरायचं कुठे? जाणून घ्या सविस्तर

त्या दिवशी, म्हणजे 22 एप्रिल रोजी, पहलगाममध्ये झिपलाईन करत असताना भट्ट यांनी हा व्हिडीओ शूट केला. त्यावेळी गोळ्यांचा आवाज फारसा लक्षात आला नाही, पण काही वेळातच अनेक लोक जमिनीवर कोसळलेले दिसले. 'मी जेव्हा गोळ्यांचा आवाज वारंवार ऐकला आणि मृतदेह दिसले, तेव्हा समजलं की हा दहशतवादी हल्ला आहे,' असं त्यांनी सांगितलं. त्यांचा मोबाइल सेल्फी स्टिकवर लावलेला असल्याने हा क्षण व्हिडीओमध्ये कैद झाला.

ऋषी भट्ट पुढे सांगतात की, 'माझी राईड संपताना माझ्या पत्नी आणि मुलगा ओरडत होते. ते मला व्हिडीओ थांबवायला सांगत होते. मी तात्काळ व्हिडीओ थांबवला आणि बेल्ट काढून त्यांच्या दिशेने धावलो. त्यावेळी माझ्या पत्नीने सांगितलं की दोन लोकांना धर्म विचारून ठार मारण्यात आलं. माझ्याही डोळ्यांसमोर दोन मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.' 

हेही वाचा: महाराष्ट्रातील मृत पर्यटकांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत- देवेंद्र फडणवीसांची घोषणा

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावरही मोठी खळबळ उडाली आहे. अनेकांनी दहशतवाद्यांच्या या अमानवी कृत्याचा निषेध करत, जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. प्रशासनानेही या व्हिडीओची गंभीर दखल घेतली असून, तपास यंत्रणा त्यावर काम करत आहेत. 


सम्बन्धित सामग्री