भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत आता एक दिलासादायक अपडेट समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो गंभीर जखमी झाला होता. मात्र त्याची तब्येत आता स्थिर असून त्यात हळूहळू सुधारणा होत असल्याचे वृत्त आहे.
सिडनीतील रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्याला अतिदक्षता विभागातून हलवण्यात आले असून, डॉक्टर त्याच्यावर सतत लक्ष ठेवून उपचार करत आहेत. टीम इंडियाच्या टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्याने सांगितले की, अय्यर आता फोनवर स्वतः उत्तरे देत आहे आणि त्याच्या प्रकृतीत सकारात्मक बदल दिसत आहेत.
सामन्यात अॅलेक्स केरीचा कॅच घेताना अय्यरच्या डाव्या बाजूच्या बरगड्यांना जोरदार धक्का बसला. डाईव्ह घेताना त्याच्या या भागाला मार बसून अंतर्गत रक्तस्राव सुरू झाला. सुरुवातीला फिजिओने त्याला मैदानाबाहेर नेले, परंतु काही वेळातच त्याची तब्येत बिघडल्याने त्याला तातडीने रुग्णालयात हलवावे लागले.
हेही वाचा: The Family Man Season 3 : प्रतिक्षा संपली ! मनोज वाजपेयीचा 'द फॅमिली मॅन सीझन 3' 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, टिझर समोर
BCCI च्या वैद्यकीय पथकाने तातडीने केलेल्या उपचारांमुळे गंभीर स्थितीवर नियंत्रण ठेवता आले. बोर्डचे वैद्यकीय प्रमुख डॉ. दिनशॉ पारडीवाला यांनी ऑन-फील्ड स्टाफच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, योग्य वेळी झालेल्या मदतीमुळे मोठा धोका टळला.
सूर्यकुमार यादवने सांगितले की, जखमी झाल्यानंतरच्या पहिल्या दिवशी त्याला संपर्क साधता आला नव्हता. मात्र पुढील दिवसांमध्ये अय्यरशी त्याचा संपर्क झाला आणि तो स्वतः फोनवर बोलत असल्याचे पाहून सर्वांना दिलासा मिळाला आहे. डॉक्टरांनी त्याला आणखी काही दिवस निरीक्षणाखाली ठेवण्याचे ठरवले आहे.
श्रेयस अय्यरचे कुटुंबीय लवकरच सिडनीला पोहोचणार आहेत. त्याच्या उपचारांदरम्यान ते त्याच्या सोबत राहतील, अशी माहिती समोर आली आहे. डॉक्टरांच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत त्याच्या प्रकृतीत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा: 8th Pay Commission: मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाकडून आठव्या वेतन आयोगाला मान्यता