नवी दिल्ली : जम्मू-कश्मीरमध्ये अतिरेक्यांनी पुन्हा डोकेवर काढले आहे आणि प्रथमच पर्यटकांना टार्गेट केले आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला आहे. अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात दोन पर्यटक जखमी झाल्याचे वृत्त असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कश्मीरमध्ये अनेक वर्षांनंतर प्रथमच पर्यटकांना टार्गेट करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर दहशत निर्माण करण्यासाठी हा हल्ला झाल्याचे म्हटले जात आहे. पहलगाम आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेच्या तयारीमुळे आणि अलीकडील हल्ल्यांमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क आहे. लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिस संयुक्तपणे तपास आणि गस्त घालत आहेत. पहलगाम हे जम्मू-काश्मीरमधील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. अशा हल्ल्यांमुळे पर्यटकांमध्ये भीती निर्माण होऊ शकते, विशेषत: मे-जूनच्या पर्यटन हंगामात आणि आगामी अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर भीती निर्माण करण्यासाठी हा हल्ला केल्याचे म्हटले जात आहे.
पहलगाममध्ये अतिरेक्यांच्या पर्यटकांवरील हल्ल्यात 27हून अधिक पर्यटक ठार झाल्याची सूत्रांची माहिती आहे. जखमींमध्ये महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे. टीआरएफ (The Resistance Front) संघटनेने जबाबदारी स्वीकारली असून धर्म विचारून गोळीबार केल्याचीही माहिती आहे. आता पर्यटकांनी काश्मीरमधून परतण्यास सुरुवात केली आहे. लग्नानंतर पहिल्यांदा फिरायला गेलेले पर्यटकही या हल्ल्याचे शिकार झाले आहेत. दरम्यान नवविवाहितेचा आक्रोश करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. "तो खात होता, माझ्या बाजुला होता. त्याला गोळी मारली. मुसलमान नाही म्हणून गोळी मारली. माझ्या पतीला वाचवा..... माझ्या पतीला वाचवा.... कृपया मला मदत करा." असा आक्रोश नवविवाहितेकडून केला जात आहे.
हेही वाचा : 'नव्या वक्फ कायद्याबाबत मुस्लिमांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करा'
पहलगाममधील दहशतवादी हल्ला प्रकरणात मृतांमध्ये पुण्यातील 2 पर्यटकांचा समावेश आहे. दिलीप डिसले, अतुल मोने अशी मृत व्यक्तीची नावे आहेत. पनवेलचे माणिक पटेल, एस. भालचंद्रराव जखमी आहेत. या दोघांचीही प्रकृती सध्या स्थिर आहे.