First Snowfall on Vaishno Devi Temple: जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील प्रसिद्ध माता वैष्णोदेवी मंदिरावर या वर्षातील पहिली बर्फवृष्टी झाली आहे. गुरुवारी त्रिकुटा पर्वतांच्या शिखरांवर बर्फाचे पांढरे पांघरूण पसरल्याने संपूर्ण तीर्थक्षेत्राचे दृश्य मनमोहक झाले आहे. वैष्णोदेवीसह भादरवाह खोरे, पटनीटॉप, नाथाटॉप, सनासर आणि बटोटे यांसारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांवरही हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली आहे. शुक्रवारी सकाळी जेव्हा स्थानिक नागरिक जागे झाले, तेव्हा घरांभोवती पसरलेली बर्फाची पांढरी चादर पाहून त्यांना सुखद धक्का बसला. यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले हॉटेल मालक, टॅक्सी चालक आणि स्थानिक व्यापारी यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.
शेती आणि आरोग्यासाठी बर्फवृष्टी ठरणार फायदेशीर
हवामानशास्त्रज्ञांच्या मते, जम्मू प्रांतात मध्यरात्री पावसाला सुरुवात झाली आणि उंचावरील भागात त्याचे रूपांतर बर्फवृष्टीत झाले. या पावसामुळे आणि हिमवृष्टीमुळे पर्यावरणाला मोठा फायदा अपेक्षित आहे. यामुळे वातावरणातील धूळ आणि प्रदूषण कमी होऊन लोकांच्या आरोग्यात सुधारणा होईल. तसेच भूजल पातळी वाढल्याने विहिरी आणि नैसर्गिक झरे पुन्हा जिवंत होतील. फळे आणि भाजीपाला उत्पादनासाठी ही बर्फवृष्टी अत्यंत पोषक मानली जात असून, यामुळे पुढील काळात वीज टंचाई कमी होण्यासही मदत होणार आहे. एप्रिलमधील काही आपत्तींमुळे मंदावलेल्या पर्यटनाला या बर्फवृष्टीमुळे पुन्हा उभारी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
मुसळधार हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत
एकीकडे बर्फवृष्टीने आनंद आणला असला, तरी दुसरीकडे काश्मीर खोऱ्यात मुसळधार बर्फवृष्टीमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. खराब हवामानामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला असून, काझीगुंडसह अनेक भागांत रस्ते बर्फाखाली गेले आहेत. श्रीनगर विमानतळावरील 26 उड्डाणे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. अनंतनाग आणि पूंछ सारख्या भागात जोरदार वारे आणि बर्फामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. पूंछमध्ये एक बस बर्फात अडकल्याची घटनाही समोर आली आहे.
हेही वाचा - Census of India 2027 : या तारखेपासून जनगणनेला सुरूवात; पहिल्या टप्प्यात सरकार नक्की काय विचारणार? जाणून घ्या सविस्तर माहिती
प्रशासनाकडून हेल्पलाइन जारी
हिमवृष्टीची तीव्रता लक्षात घेता, भादरवाह पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने तात्काळ हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. उंचावरच्या भागात प्रवास करताना नागरिकांनी आणि पर्यटकांनी विशेष सावधगिरी बाळगावी, असा सल्ला देण्यात आला आहे. वीज विकास विभागाने (PDD) खंडित झालेली वीज सेवा पूर्ववत करण्यासाठी तांत्रिक पथके तैनात केली असून, रस्ते साफ करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.