Sunday, March 08, 2026 01:29:08 PM

Safety Of Tirumala Prasadam: श्रद्धेला तंत्रज्ञानाची जोड; प्रसादातील भेसळ रोखण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, लाडूच्या गुणवत्तेसाठी आता 'ई-नोज' तंत्रज्ञानाचे कवच

या मोहिमेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे फ्रान्सहून आयात करण्यात येणारी 'ई-टंग' (E-Tongue) आणि 'ई-नोज' (E-Nose) ही अत्याधुनिक यंत्रे.

safety of tirumala prasadam श्रद्धेला तंत्रज्ञानाची जोड प्रसादातील भेसळ रोखण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय लाडूच्या गुणवत्तेसाठी आता ई-नोज तंत्रज्ञानाचे कवच

आंध्रप्रदेश: तिरुपतीचा 'लाडू' म्हणजे केवळ एक प्रसाद नाही, तर तो जगभरातील कोट्यवधी भाविकांच्या अतूट श्रद्धेचा आणि अस्मितेचा केंद्रबिंदू आहे. मात्र, गेल्या काही काळापासून या प्रसादाच्या गुणवत्तेवरून आणि तुपातील कथित भेसळीवरून वादाचे मोठे मोहोळ उठले होते. भाविकांच्या मनात दाटलेले संशयाचे मळभ दूर करण्यासाठी आणि प्रसादाचे सात्विक पावित्र्य अबाधित राखण्यासाठी आता आंध्र प्रदेश सरकारने विज्ञानाची साथ घेण्याचे ठरवले आहे. 'शुद्धतेचा मंत्र आणि तंत्राचा आधार' घेत तिरुमला येथे आता एक जागतिक दर्जाची अन्न प्रयोगशाळा आकाराला येत आहे, जी प्रसादाच्या गुणवत्तेवर 24 तास नजर ठेवणार आहे.

या मोहिमेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे फ्रान्सहून आयात करण्यात येणारी 'ई-टंग' (E-Tongue) आणि 'ई-नोज' (E-Nose) ही अत्याधुनिक यंत्रे. सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्चून मागवण्यात आलेली ही यंत्रे मानवी ज्ञानेंद्रियांनाही न जाणवणारे तुपातील सूक्ष्म बदल किंवा भेसळ क्षणात ओळखून काढण्यास सक्षम आहेत. तुपाचा गंध आणि चव यामध्ये थोडीही तफावत आढळल्यास ही यंत्रे तातडीने धोक्याची घंटा वाजवतील. केवळ तूपच नव्हे, तर प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या काजू, मनुका, बदाम, वेलची, साखर आणि अगदी हळद-मिरची अशा 60 हून अधिक कच्च्या मालाची या प्रयोगशाळेत कसून तपासणी केली जाणार आहे.

हेही वाचा: Parth Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड! मुंबईतील बैठकीत राज्यसभेसाठी पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

आंध्र प्रदेशचे आरोग्यमंत्री वाय. सत्यकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रयोगशाळा उभारली जात असून, यासाठी सुमारे 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) या प्रकल्पासाठी 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तिरुमला येथील 12,000 चौरस फूट क्षेत्रावर पसरलेल्या दोन मजली इमारतीत ही यंत्रणा कार्यान्वित होईल. यामध्ये 200 हून अधिक प्रकारचे कीटकनाशकांचे अवशेष, जड धातू आणि सूक्ष्मजीव तपासण्याची क्षमता असेल. म्हणजेच, आता प्रसादाचा प्रत्येक कण हा विज्ञानाच्या कसोटीवर उतरल्यानंतरच भाविकांपर्यंत पोहोचणार आहे.

राजकीय पटलावर या विषयावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, सरकारने मात्र ठोस पावले उचलण्यावर भर दिला आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मागील सरकारच्या काळात गुणवत्तेशी तडजोड झाल्याचा आरोप केला होता, ज्यावरून एसआयटी (SIT) चौकशीही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, मे महिन्यापर्यंत सर्व उपकरणांची मांडणी पूर्ण करून ही प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आरोग्य विभाग आणि टीटीडीचे सुमारे 40 तज्ज्ञ कर्मचारी या प्रयोगशाळेचे कामकाज पाहणार असून, पाण्याचे नमुनेही वेळोवेळी तपासले जातील.

थोडक्यात सांगायचे तर, तिरुमला देवस्थान आता तंत्रज्ञानाच्या शक्तीने प्रसादाची शुद्धता जपणार आहे. प्रसादाच्या चवीत कोणताही 'राजकीय' किंवा 'भेसळीचा' अंश राहू नये, यासाठी ही यंत्रणा एक संरक्षक भिंत म्हणून काम करेल. भाविकांची श्रद्धा आणि विज्ञानाची खात्री यांचा हा संगम तिरुपती लाडूचा गोडवा पुन्हा एकदा सातासमुद्रापार निर्दोषपणे पोहोचवण्यास सज्ज झाला आहे.

हेही वाचा: Gold Silver Rates Today: दिल्ली ते चेन्नई सोन्याचा भाव वधारला; तर चांदी..., तुमच्या शहरातील 22 आणि 24 कॅरेटचे दर एका क्लिकवर


सम्बन्धित सामग्री