Friday, December 05, 2025 02:27:24 AM

150 Years Of Vande Mataram: राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण; पंतप्रधान म्हणाले, 'हे केवळ राष्ट्रीय गीत नाही, तर...'

वंदे मातरम् रचनेला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिल्लीमध्ये भव्य सोहळा झाला. PM मोदींनी वंदे मातरम् हे मंत्र, उर्जा आणि भविष्याचा निर्धार असल्याचे सांगत देशाला नवी प्रेरणा दिली.

150 years of vande mataram राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण पंतप्रधान म्हणाले हे केवळ राष्ट्रीय गीत नाही तर

150 Years Of Vande Mataram: भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून परिचित असलेले ‘वंदे मातरम्’ या अमर रचनेला आज तब्बल 150 वर्षे पूर्ण होत आहेत आणि या निमित्ताने देशभरात भव्य उत्सवांची सुरुवात झाली आहे. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममध्ये आयोजित प्रमुख कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हजेरी लावून या ऐतिहासिक क्षणाला उपस्थित राहिले. मोदींनी यावेळी भाषण करताना सांगितले की ‘वंदे मातरम्’ हे केवळ काही शब्द नाहीत, तर ते मंत्र, शक्ती, स्वप्न आणि भविष्याचा निर्धार आहे. हे शब्द मातृभूमीच्या पूजनाचे प्रतीक आहेत आणि स्वातंत्र्याच्या काळात जशी प्रेरणा दिली तशीच आजही पिढ्यांना नवी उमेद देणारी ही रचना आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की 'वंदे मातरम्चा' सामूहिक गजर हा शब्दांपलीकडचा अनुभव आहे. हजारो आवाज एकाच लयीत, एकाच भावना आणि एकाच ऊर्जा प्रवाहात जेव्हा एकत्र येतात तेव्हा निर्माण होणारी स्पंदने मनात रोमांच निर्माण करणारी असतात. त्यांनी म्हटलं की हा जल्लोष शब्दात व्यक्त करता येत नाही, ही एक अनुभूतीच आहे जी भारतातल्या प्रत्येक नागरिकाला राष्ट्रभक्तीची जाणीव पुन्हा नव्याने करून देते.

7 नोव्हेंबर हा दिवस ‘इतिहासात लिहून ठेवावा असा’ दिवस असल्याचे मोदी यांनी सांगितले. 150 वर्षांचा हा सोहळा आता संपूर्ण वर्षभर साजरा होणार आहे. 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 या कालावधीत देशभरात विशेष कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम, जनजागृती उपक्रम आणि शिक्षण संस्थांमध्ये विशेष प्रकल्पाचे आयोजन होणार आहे.

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी स्मारक नाणे आणि टपाल तिकीटाचे प्रकाशन केले. तसेच ‘वंदे मातरम्’ या गीताच्या 150व्या वर्षानिमित्त खास पोर्टलही सुरू करण्यात आले. हा सोहळा अधिक खास बनवणारी गोष्ट म्हणजे देशभरातील विविध सार्वजनिक ठिकाणी, शाळा–महाविद्यालये, सांस्कृतिक संस्थांमध्ये लोकांनी एकत्र येऊन संपूर्ण ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन केले.

या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, दिल्लीचे उपराज्यपाल विनय सक्सेना आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी हजेरी लावली.

‘वंदे मातरम्’ ही रचना बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1876 मध्ये तयार केली. पुढे ती 1882 मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत समाविष्ट करण्यात आली. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात या गीताने लाखो भारतीयांच्या संघर्षाला दिशा दिली. त्यामुळे अनेक भारतीयांसाठी हे गीत म्हणजे राष्ट्रीय अभिमानाचा गाभा आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ही रचना आजही देशाला जोडून ठेवते.


सम्बन्धित सामग्री