Monday, March 09, 2026 02:25:30 AM

IND vs PAK: 'आम्ही हस्तांदोलन करण्यास तयार...'; भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराचं सूचक विधान

दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा याने भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन करण्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.

ind vs pak आम्ही हस्तांदोलन करण्यास तयार भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराचं सूचक विधान

IND vs PAK: टी-20 विश्वचषकात रविवारी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी मैदानाबाहेरील वातावरणात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा याने भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन करण्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. "आम्ही हस्तांदोलन करण्यास तयार आहोत," असे सांगत त्याने खेळाची भावना जपण्याचे आवाहन केले. मात्र, भारतीय संघ आपल्या जुन्या भूमिकेवर ठाम राहण्याची शक्यता असल्याने टॉसच्या वेळी दोन्ही कर्णधार हात मिळवणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

"उद्या काय होते ते पाहू"; सलमान आघाची सावध प्रतिक्रिया
सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत जेव्हा सलमान आघाला हस्तांदोलनाच्या परंपरेबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने थेट उत्तर देणे टाळले. तो म्हणाला, "आपण उद्या त्याबद्दल काय होते ते पाहू. मला आशा आहे की हा खेळ सुरुवातीपासून ज्या भावनेने खेळला जात आहे, त्याच खेळाडूवृत्तीने खेळला जाईल." पाकिस्तानने सुरुवातीला या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची भाषा केली होती, मात्र आता सलमानने कोणताही नवा वाद टाळण्याचा प्रयत्न करत सामंजस्याची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

भारताचा 'नो हँडशेक' प्रोटोकॉल आणि ऑपरेशन सिंदूर
भारतीय संघाने पाकिस्तानशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय हा राष्ट्रीय सन्मानाशी जोडला आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये दुबईतील आशिया कप दरम्यान भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने स्पष्ट केले होते की, एप्रलिमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या भारतीय नागरिकांच्या सन्मानार्थ टीम इंडिया पाकिस्तानशी हस्तांदोलन करणार नाही. या निर्णयाकडे 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारतीय सैन्याशी एकतेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, रविवारी होणाऱ्या सामन्यातही हाच प्रोटोकॉल पाळला जाण्याची दाट शक्यता असून, टॉसच्या वेळी किंवा सामन्यानंतर दोन्ही कर्णधार हस्तांदोलन करणार नाहीत.

हेही वाचा - Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी पुढील काही दिवस क्रिकेटपासून दूर राहणार; 'या' कारणामुळे घेतला महत्त्वाचा निर्णय

का बिघडली हस्तांदोलनाची परंपरा?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यात नेहमीच चुरस असते, मात्र गेल्या काही काळापासून मैदानावरील शिष्टाचारात मोठे बदल झाले आहेत. सीमेवरील वाढता तणाव आणि दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आणि संघ व्यवस्थापनाने कडक पावले उचलली आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नागरिकांच्या भावना तीव्र होत्या, ज्याचा आदर राखण्यासाठी सूर्यकुमार यादवने सार्वजनिकरित्या हस्तांदोलन टाळण्याची घोषणा केली होती. यामुळे क्रिकेटच्या मैदानात आता केवळ खेळाचा संघर्षच नाही, तर राष्ट्रीय अस्मितेची लढाई देखील पाहायला मिळत आहे.
 


सम्बन्धित सामग्री