Nirmala Sitharaman On GST Cut: देशातील सामान्य जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. 22 सप्टेंबर रोजी जीएसटी दर कपात लागू झाल्यानंतर दैनंदिन वापरातील 54 वस्तूंच्या किमतींमध्ये 6 ते 12 टक्क्यांची घट झाली असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. सीतारमण यांमी म्हटलं आहे की, लोणी, तूप, टूथब्रश, शॅम्पू, छत्री, खेळणी यांसारख्या दैनंदिन वापरातील वस्तूंवरील जीएसटी दर कमी केल्याचा थेट फायदा ग्राहकांना होत आहे. मात्र, जीएसटी कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सीतारमण यांनी दिला.
हजारो तक्रारींची चौकशी सुरू
ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडे आलेल्या 3075 तक्रारी अप्रत्यक्ष कर विभागाकडे चौकशीसाठी पाठवण्यात आल्या असून, जीएसटी अधिकार्यांनी या तक्रारींची तपासणी सुरू केली आहे. सरकारने नागरिकांना आवाहन केले आहे की, जर जीएसटी कपातीचा लाभ मिळाला नसेल तर तक्रार नोंदवावी. काँग्रेसच्या टीकेवर उत्तर देताना सीतारमण म्हणाल्या, ही कोणतीही दुरुस्ती नाही. काँग्रेसने जीएसटी लागू करण्याचा प्रयत्नही केला नाही. दर कपात ही जनतेच्या फायद्यासाठी घेतलेला निर्णय आहे. देशाचे मासिक जीएसटी संकलन 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यातून कर कपातीचा फायदा ग्राहकांना देण्याची संधी निर्माण झाली. दर कपातीमुळे मागणी, उत्पादन आणि रोजगारात वाढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - Silver Rate: धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीच्या दरात लक्षणीय घट, आजचा दर काय?
स्वदेशीची भावना आणि विकासाचा वेग वाढला
सीतारमण यांनी नमूद केले की, देशात स्वदेशी उत्पादने वापरण्याची भावना वाढत आहे. जीएसटी दर कपात आणि उत्पादन क्षेत्रातील वाढ यामुळे भारताची अर्थव्यवस्था अधिक स्थिर आणि मजबूत होत आहे. जीएसटी दर कपातीमुळे जनतेला दिलासा मिळाला असून, महागाई कमी होण्यास आणि खरेदीशक्ती वाढण्यास मदत होईल. सरकारने नफेखोरांवर कारवाईची घोषणा करून ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
हेही वाचा - ITR Portal Update: ई-फायलिंग पोर्टलवर नवी सुविधा! आता करदात्यांना कळणार 'ही' महत्त्वाची गोष्ट
दरम्यान, वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे की, आयकर सवलती आणि जीएसटी कपात या दोन्ही उपायांमुळे अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भारताचा विकासदर 6.6 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, हे याच निर्णयाचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले. तथापी, अश्विनी वैष्णव यांनीही सांगितले की, जीएसटी दर कपातीनंतर मोबाइल, टीव्ही, एअर कंडिशनर यांसारख्या वस्तूंच्या विक्रीत 20-25 टक्के वाढ झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात आधीच 25 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला असून, पुढे या क्षेत्रात आणखी वाढ अपेक्षित आहे.