भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) सुरक्षेचे कारण देत नकार दिला होता. बांगलादेशने आपले सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली होती, जी आयसीसीने फेटाळून लावली. त्यानंतर शनिवारी 24 जानेवारी रोजी आयसीसीने बांगलादेशला स्पर्धेतून बाद करून त्यांच्या जागी स्कॉटलँड संघाचा समावेश केला. त्यानंतर पाकिस्तानने भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकत टी-20 विश्वचषकातून माघार घेण्याची धमकी दिली. अशातच एक मोठी अपडेट समोर आली आहे.
हेही वाचा- India vs Pakistan : अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे पाकिस्तानला 253 धावांचे लक्ष्य; कोण मारणार बाजी?
आशिया कप 2026 च्या टी20 विश्वचषकात भारताविरुद्धच्या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकला आहे. पाकिस्तानच्या एक्स अकाउंटवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की "15 फेब्रुवारी 2026 रोजी भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघ मैदानात उतरणार नाही. पाकिस्तानचे इस्लामिक रिपब्लिक सरकार आयसीसी वर्ल्ड टी20 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट संघाला मान्यता देते, तथापि, पाकिस्तान क्रिकेट संघ 15 फेब्रुवारी 2026 रोजी भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यात मैदानात उतरणार नाही." असे जाहीर केले आहे. दरम्यान ईएसपीएनक्रिकइन्फोने पीसीबीशी संपर्क साधून पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना खेळण्यास नकार दिल्याचे कारण विचारले आहे. पाकिस्तान भारत, नामिबिया, नेदरलँड्स आणि यूएसए सोबत ग्रुप अ मध्ये असून त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. जर पाकिस्तानने सामन्यावर बहिष्कार टाकला तर त्यांना भारताविरुद्धच्या सामन्यातील दोन गुण गमवावे लागतील.
हेही वाचा- India vs Pakistan : निकाल लागण्यापूर्वीच टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री; पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं?
एकीकडे भारतविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यावर बहिष्कार टाकण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तानच्या संघाने आपला संघही जाहीर केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी 15 खेळाडूंच्या संघाची अधिकृत घोषणा केली आहे. या संघाचं नेतृत्व सलमान अली आघा करणार आहे. तसेच आयसीसी बांगलादेशला दुसरी संधी देऊ शकते. ज्यामुळे बांगलादेश आणि पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत.