Tuesday, February 17, 2026 04:54:06 PM

Ajit Pawar Funeral : लाडक्या बहिणींची खदखद! "दादा, राखी बांधता आली नाही ओ..." महिलेचा एकच टाहो

अजित पवार यांनी गेल्या वर्षी सुरू केलेली 'लाडकी बहीण योजना' ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील अत्यंत लोकप्रिय योजना ठरली. आज अंत्यदर्शनावेळी एका महिलेने हातातील राखी दाखवत...

ajit pawar funeral  लाडक्या बहिणींची खदखद  quotदादा राखी बांधता आली नाही ओquot महिलेचा एकच टाहो

Ajit Pawar Final Ritual : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी, 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या धक्क्यातून सावरणे केवळ पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण राज्याला कठीण जात आहे. आज, 29 जानेवारी रोजी दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या मूळ गावी, काटेवाडी येथे जनसागराचा महापूर लोटला होता. सकाळपासूनच हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी जमले होते. फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून जेव्हा दादांची अंतिम यात्रा निघाली, तेव्हा "अजित दादा अमर रहे" आणि "अजित दादा परत या" अशा घोषणांनी बारामतीचा परिसर दणाणून गेला.

'लाडक्या बहिणी' आणि तो अपूर्ण राहिलेला सण
अजित पवार यांनी गेल्या वर्षी सुरू केलेली 'लाडकी बहीण योजना' ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील अत्यंत लोकप्रिय योजना ठरली. आज अंत्यदर्शनावेळी एका वृद्ध महिलेने हातातील राखी दाखवत फोडलेला टाहो पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावले. "दादा, यावेळेस तुमची राखी आणली होती, पण ती बांधायची इच्छा अपूर्णच राहिली," असे म्हणत त्या माऊलीने हंबरडा फोडला. अनेक महिलांना आपले हुंदके आवरता येत नव्हते. ज्या भावाने आम्हाला सन्मान निधी दिला आणि नेहमीच आधारवड म्हणून उभे राहिले, तो हक्काचा भाऊ असा अर्ध्यावर सोडून जाईल, याची कल्पना कोणाही केली नव्हती.

हेही वाचा - Ajit Pawar Death: 'अजूनही विश्वास बसत नाही…' अजित पवार यांच्या निधनानंतर सुप्रिया सुळेंचा भावनिक WhatsApp स्टेटस

गुलाबी थीम आणि कामाचा झपाटा
अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत वापरलेली 'गुलाबी थीम' आणि लाडक्या बहिणींसाठी दाखवलेली तत्परता यामुळे महिला वर्गात त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण झाले होते. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून त्यांनी या योजनेतील अनेक तांत्रिक अडचणी तातडीने सोडवल्या होत्या. "निधीची कमतरता पडू देणार नाही" हा त्यांचा शब्द महिलांसाठी मोठा आधार होता. आज त्यांच्या निधनानंतर या महिलांना आपण पोरके झाल्याची भावना सतावत आहे. बारामती आणि काटेवाडीतील घरोघरी आज चुली पेटल्या नाहीत, प्रत्येक जण आपल्या लाडक्या 'दादां'च्या आठवणीत सुन्न झाला आहे.

भीषण अपघाताने हिरावला लोकनेता
बुधवारी सकाळी 8:10 वाजता मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या लिअरजेट-45 विमानाचा सकाळी 8:44 च्या सुमारास भीषण अपघात झाला. धावपट्टीवर उतरत असताना विमानाने पेट घेतला आणि त्यात अजित पवारांसह एकूण 6 जणांचा (ज्यामध्ये पीएसओ विदीप जाधव आणि अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश होता) दुर्दैवी अंत झाला. आज दुपारी बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या दोन्ही पुत्रांनी, पार्थ आणि जय यांनी चितेला मुखाग्नी दिला. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचा लोकनेता अशा प्रकारे काळाच्या पडद्याआड गेला, ही चटका लावणारी वस्तुस्थिती राज्याला दीर्घकाळ सलत राहील.

हेही वाचा - Ajit Pawar Death: अजित पवारांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे बारामतीत; पवार कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट


सम्बन्धित सामग्री